औरंगाबादचे पालकमंत्री भुमरे यांनी केली इज्तेमा स्थळाची पाहणी

औरंगाबाद,८ डिसेंबर / प्रतिनिधी :-चित्तेगाव परिसरात आयोजित केलेल्या तबलिकी इज्तेमा शांततापूर्ण व सुविधायुक्त वातावरणात व्हावा यासाठी जिल्हा प्रशासन नागरिकांना मदत करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी चित्तेगाव इज्तेमा स्थळाच्या पाहणी दरम्यान बोलताना दिली.

            जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विकास मीना, पोलीस उप अधीक्षक श्री.लांजेवार, उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे तसेच मोठ्या संख्येने स्वंवयसेवक या ठिकाणी उपस्थित होते.

            कोविड कालावधीनंतर दोन वर्षानी इज्तेमाचे आयोजन होत असून ही संधी पैठण तालुक्याला मिळाली. पालकमंत्री या नात्याने इज्तेमासाठी येणाऱ्या भाविकांना वाहतुक, आरोग्य, तसेच इतर सुविधा देण्यात येणार आहेत. शांततेत व सोहार्द वातावरणात इज्तेमा पार पाडण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हास्तरीय इज्तेमा सामितीच्या सदस्यासह स्वंयसेवकाना मंत्री भुमरे यांनी केले. इज्तेमा स्थळाची पाहणी करताना निवास व्यवस्था, भोजन कक्ष, वैद्यकीय कक्ष, आपत्तकालीन अग्नीशमन यंत्रणा, वीज, पाणी याबाबत पाहणी केली. यामध्ये तालुकानिहाय वाहन आणि व्यक्तीची व्यवस्था पेंडॉलमध्ये करण्यात आली असून शिस्तबद्ध पद्धतीने हा दोनदिवसीय कार्यक्रम पार पाडला जाणार असल्याचे सांगितले.जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सर्व मुस्लीम बांधवाना इज्तेमासाठी आवश्यक असलेले मदत जिल्हा प्रशासनामार्फत केली जाईल असे पाहणी वेळी सांगितले.