मराठवाड्यासाठी मागील फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत केलेल्या घोषणा अपूर्णच-विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

छत्रपती संभाजीनगर,१५ सप्टेंबर /प्रतिनिधी :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात संभाजीनगर येथे मंत्रिमंडळ बैठक २०१६ मध्ये झाली होती.या बैठकीमध्ये मराठवाड्याच्या विकासासाठी 41 हजार कोटी रुपयांचा कालबद्ध कार्यक्रम घोषित करण्यात आला होता.परंतु यामध्ये घेण्यात आलेले निर्णय अजूनही अपूर्ण असल्याची माहिती पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज दिली.सध्याच्या सरकारमध्ये फडणवीस हे सुपर सीएमच्या भूमिकेत आहेत त्यांनी इतर अवास्तव घोषणा केल्यापेक्षा यांचेच कामे पूर्ण करावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

1. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संभाजीनगरातील घोषित स्मारकाचे काम किती वर्षे चालणार?

2. धाराशिवच्या तेर येथे वस्तुसंग्राहलयसाठी घोषित आठ कोटींचे काम अजूनही सुरूच आहे. भीक देत आहात का?

3 सुमारे 450 कोटींच्या म्हैसमाळ विकास आराखड्याचे काय

झाले? आज तिथे जाण्यासाठी नीट वाटही उरलेली नाही.

4. नांदेड जिल्ह्यातील माहूरच्या विकासासाठी घोषित सुमारे 250 कोटी कुठे आहेत? भंपक वागण्यातून देव देवतांना तरी सोडा ?

5. लातूरला विभागीय क्रीडा संकुल दिले होते. ते आता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर बांधणार आहात का?

6. मराठवाड्यात डेअरी विकास बोर्डाच्या माध्यमातून 1000 गावात दूध योजना ‘आणून 1.25 लाख लोकांना रोजगार देणार होतात. योजना नक्की मराठवाड्यासाठीच होती की विदर्भासाठी?

7. संभाजीनगरातील करोडीला ट्रान्सपोर्ट हब बनवणार होतात. अजून जमीन सापडली नाही का?

8. परभणी येथे 68 एकरावर टेक्स्टाईल पार्क उभारणार होतात ? तुमच्या साधी जागा तरी पाहिली आहे का या प्रकल्पासाठी?

9. मराठवाड्याची वॉटर ग्रीड योजना कुठे बारगळली ? आज मराठवाडा पुन्हा दुष्काळाच्या काळ्या छायेत गेला आहे.

10. कृष्ण-मराठवाडा सिंचन योजनेसाठी 4800 कोटी देणार होतात. किती कवड्या दिल्या, काम किती झाले?

11. ‘इतर’ सिंचन प्रकल्पांसाठी 1048 कोटी देणार होतात ? हे ‘इतर’ कोणते आणि त्याला किती निधी दिला?

12. नगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी 2826 कोटींची कबुली

होती. किती निधी दिलात, कारण प्रकल्प अजूनही अपूर्णच आहे.

13. विमानतळ विस्तारीकरणासाठी 200 कोटीची घोषणा केलीत. विस्तार राहील विमानांची नवीन शहरांशी जोडणी संभाजीनगरला मिळावी यासाठी साधे पत्र तरी लिहिले का?

14. संभाजीनगर पॉलिटेक्निकला अभियांत्रिकी महाविद्यालयात रूपांतर करण्यासाठी एक कोटी. सध्याचा गव्हर्नमेंट इंजिनियरिंग कॉलेजमध्ये पुरेसे शिक्षक नसल्याने अनेक विभाग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, अजून एक कॉलेज देऊन तिथे काय पाहायचे ? नुसत्या भिंती?

15. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावाच्या संस्थेला 279 कोटी देणार होतात. प्रत्यक्षात मंजूर केले फक्त 12 कोटी. किमान तुमच्याच पक्षाचे गोपीनाथ मुंडे यांचे तरी व्हा? 16. ग्रामीण भागात 1.21 लाख घरे (180 कोटी खर्चून) बांधणार होतात. किती लोकांना छप्पर मिळाले, जरा सांगता का?

17. 25 हजार हेक्टरवर फळबागा उभारण्यासाठी 375 कोटींची कबुली होती. आज ती झाडे मोठी झाली असतील ना सांगता का, ही बाग नेमकी कुठे आहे?

18. जालन्यात सीड पार्क साठी 109 कोटींचा वायदा होता.

तुमच्या या घोषणेची वाट पाहून आज सीड कंपन्यांची मुख्यालये हैद्राबादला स्थलांतरित होत आहेत. यंदा नव्या घोषणांच्या पूर्वी जुन्या यादीचे काय झाले हे पण आपण सांगाल, अशी अपेक्षा मराठवाड्याच्या जनतेला आहे. यंदा संभाजीनगरात येत असताना घोषणा जरा जपूनच करा. कारण आपल्या खोकेबाजीची, धोकेबाजीची नोंद तब्बल 32 देश घेत असतात, असं म्हणतात. तुमच्या दिल्लीश्वर पातशहा’ सवय आहे शब्द फिरवायची/विसरायची. तीच तुम्हालाही लागली आहे!