मुख्यमंत्र्यांचे उद्धव ठाकरेंना एकावर एक टोले… म्हणाले ‘ही तर घरगुती मुलाखत…’

उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर एकनाथ शिंदेंचे टीकास्त्र

मुंबई : उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची नुकतीच संजय राऊत  यांनी एक मुलाखत घेतली. या मुलाखतीवर भाजपच्या नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे. आतापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांची या मुलाखतीवर कोणतीही प्रतिक्रिया आली नव्हती. मात्र आजच्या पावसाळी अधिवेशनात  मुख्यमंत्रीही उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भरभरुन बोलले आहेत. उद्धव ठाकरेंच्या आळशीपणाच्या एकावर एक मुद्दयांचा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले. मुख्यमंत्र्यांच्या विधानसभेतील या भाषणाची चांगलीच चर्चा रंगली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, काहीतरी एक दोन दिवसांपूर्वी कुणीतरी मुलाखत घेतली. जाऊ दे मी त्यात पडत नाही. घरगुती मुलाखत होती. डबल इंजिनचं काम पाहून अजित पवार आमच्या बरोबर आले आहे. ट्रिपल इंजिनचं काम वेगात सुरु आहे. आम्हाला काही लोकांनी नावं ठेवली. पण आम्ही बंद पडलेली कामं सुरु नाही केली का? आम्ही इगो वगैरे बाजूला ठेवले, इगो आणि अहंकार राज्याला मागे घेऊन जातो हे लक्षात घ्यायला पाहिजे, असं ते म्हणाले.

कुटुंबापुरतं मर्यादित उद्धव ठाकरेंचं सरकार

आम्ही रस्त्यावर उतरून काम करणारे लोक आहोत. वर्क फ्रॉम होम आमच्या पद्धतीत बसत नाही. इर्शाळवाडीची दुर्घटना झाली तेव्हा सरकार दरडग्रस्तांच्या पाठिशी सरकार उभं राहिलं. तसंच ज्या ठिकाणी पूर स्थिती निर्माण झाली तिथल्या नागरिकांना आपण मदतीचा हात दिला. आपलं सरकार हे सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकरी, कामगार यांना मदत करणारं सरकार आहे. माझं कुटुंब, माझी जबाबदारी एवढ्यापुरतं आमचं सरकार मर्यादित नाही, असा खोचक टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

नुसती तोंडाचीच वाफ आणि बुडबुडे

इर्शाळगडला दुर्घटना घडली तेव्हा मी तिथे गेलो होतो. काही लोक व्हॅनिटी व्हॅनमधून आले होते. मी गेलो म्हणून मी मोठेपणा सांगत नाही. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी तेव्हा मी संपर्कात होतो. सगळं काम सुरु होतं. एवढी मोठी यंत्रणा पोहचली आणि त्यांना मदत झाली. मी फक्त देखावा करायचा म्हणून गेलो नव्हतो. रस्त्यावर चिखल तुडवत आम्ही जातो. प्रकल्प बघायला जातो ही वस्तुस्थिती आहे. काही लोक हे वाफेचं इंजिन नाही तर नुसती त्यांच्या तोंडाचीच वाफ असते आणि बुडबुडे येतात असाही टोला एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या. आम्ही विचलीत होणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.

एकदा आमच्या मंचावर या मग…

आमच्या कामाचा वेग वाढल्यामुळे काही लोकांना पोटदुखी झाली आहे. आपल्याला तर सगळ्यांना माहित आहेच. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे कार्यकर्ते आहोत. त्यांच्या विचारांवरच आम्ही पुढे जात आहोत. आम्ही शासन आपल्या दारी हा उपक्रम सुरु केला. काही लोक म्हणाले की ही जाहिरातबाजी आहे. पण एकदा आमच्या मंचावर या तुम्हाला वस्तुस्थिती कळेल. काही लोक अनेकांना घरात घेत नव्हते त्यांना सरकार तुमच्या दारी या योजनेचं महत्त्व काय समजणार? असाही प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विचारला आहे.