शेतकऱ्यांच्या कांद्याला तेलंगणामध्ये १८०० रुपये भाव ; वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा कांदाही तेलंगणात पाठवणार – अभय पाटील चिकटगावकर

वैजापूर ,१४ जून/ प्रतिनिधी :- राज्यात खरीप कांद्यासोबतच उन्हाळी कांद्यालाही कवडीमोल भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. राज्यात ही परिस्थिती असताना तेलंगणा येथील भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष व तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी त्यांच्या राज्यातील बाजार समितीची दारे शेतकऱ्यांसाठी खुली केली असून तिथे सध्या कांद्याला १५०० ते १८०० रुपये क्विंटल भाव मिळत आहे. त्यामुळे कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांनी तेलंगणात आपला कांदा विक्रीसाठी पाठवण्यास सुरुवात केली आहे. त्यांच धर्तीवर वैजापुरात तालुक्यातील शेतकऱ्यांचा कांदाही तेलंगणामध्ये पाठवण्यात येणार आहे. अशी माहिती बीआरएसचे नेते अभय पाटील चिकटगावकर यांनी दिली. 

चिकटगावकर म्हणाले, सध्या राज्यातील क्षितिजावर समितीत शेतकऱ्यांची अक्षरशः लुट‌ होत आहे. मराठवाड्यात कांद्याचे सर्वाधिक उत्पन्न होत असतांनाही राज्य सरकार केवळ बघ्याची भुमिका घेत आहे. जातीय द्वेष, दंगलीच्या राजकारणात बळीराजा भरडला जात आहे असा आरोप चिकटगावकर यांनी केला. तेलंगणा सरकार व बीअरएसचे पक्षप्रमुख केसीआर हे मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी उदार असून राज्यात केवळ २०० रुपये क्विंटल दराने विकला जाणारा कांदा तिथे १८०० रुपयांपर्यंत खरेदी केला जात असल्याने वाहतुक खर्च वजा जाताही शेतकऱ्यांच्या पदरात अधिक पैसे पडत आहेत. याशिवाय शेतकऱ्यांना कांदा‌ साठवण्यासाठी व वाहतुक करण्यासाठी आवश्यक असलेले बारदानही मोफत मिळत आहे तसेच कांद्याचा परतावा चोवीस तासात मिळत असल्याने ही योजना शेतकऱ्यांसाठी विशेषतः कांदा उत्पादकांसाठी वरदान ठरत आहे असे ते म्हणाले. कांद्याची विक्री व्हावी यासाठी चिकटगावकर यांनी तेलंगणा राज्यातील बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

————————————–

शेतकऱ्यांंनी तेलंगणा राज्यातील बाजार समितीत आपला कांदा पाठवुन चांगला भाव मिळावा. मी केसीआर यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्यासह राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे. काहीही अडचण आल्यास शेतकऱ्यांनी संपर्क करावा.


                   —– अभय पाटील चिकटगावकर, बीआरएस नेते, वैजापूर 

——————————————