आग्रा येथील लाल किल्ल्यात शिवजयंतीला परवानगी नाकारली

संतप्त शिवप्रेमींची दिल्ली हायकोर्टात याचिका
औरंगाबाद,​२​ फेब्रुवारी / प्रतिनिधी:-  येत्या १९ फेब्रुवारीला आग्य्राच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यामध्ये अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान व आर आर पाटील फाउंडेशनला शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यास परवानगी नाकारण्याच्या पुरातत्व विभागाच्या निर्णयास संतप्त शिवप्रेमींनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका सादर करुन आव्हान दिले आहे.
याचिकेनुसार, अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानतर्पेâ ११ नोव्हेंबर २०२२ पासून या परवानगीसाठी पाठपुरावा करण्यात येत होता. आग्य्राच्या किल्ल्यात शिवजयंती साजरी करायला परवानगी द्यावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय सांस्कृतीक मंत्री जी. किशन रेड्डी यांना शिफारस पत्र दिले होते. एवढचं नाही तर रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही केंद्रीय पुरातत्व खात्याच्या मंत्र्यांची तीनवेळा भेट घेतली होती.
यापूर्वी आगाखान पुरस्कार कार्यक्रमासाठी परवानगी देण्यात आली होती. अदनान सामीच्या कन्सर्टलाही परवानगी देण्यात आली होती. ज्यांचा ऐतिहासीक संबध त्या किल्ल्याशी नाही अशांना परवानगी दिली जाते. परंतु त्या किल्ल्याशी ऐतिहासिक संबध असलेल्या शिवाजी महाराजांच्या जयंतीलाच परवानगी नाकारली. ही परवानगी नाकारताना पुरातत्व विभागाने कोणतेही कारण दिलेले आहे. थिल्लर कार्यक्रमांना परवानगी देणे परंतु, ऐतिहासिक महत्व असलेल्या कार्यक्रमास परवानगी नाकारणे यात पुरातत्व विभागाचा पक्षपातीपणा व मनमानी आहे.
शिवाजी महाराजांची आग्रा भेट
शिवाजी महाराजांची आग्रा भेट हा शिवचरित्रातील अत्यंत महत्वाचा भाग आहे. तह करण्याचा निमित्ताने औरंगजेबाने विश्वासाने शिवाजी महाराजांना आग्य्रात बोलावून घेतले होते. तिथे मात्र महाराजांचा अपमान करुन त्यांना कपटाने कैद केले होते. बुद्धीचातुर्याची चुणूक दाखवत महाराज औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन तिथून निसटले होते. या घटनेमुळे आग्रा या ठिकाणाला ऐतिहासिक महत्व आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नाही तर देशाचे आदर्श आहेत. त्यामुळे आम्ही आग्र्याच्या लाल किल्ल्यात हा कार्यक्रम आयोजित केला होता, परवानगी नाकारल्यामुळे आम्ही ही याचिका सादर केली असून न्यायदेवता आम्हाला न्याय देईल, असे अजिंक्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी सांगितले.