शिरसगाव येथे शालेय विद्यार्थ्यांना सोडून आलेल्या बसने पेट घेतला ; सुदैवाने हानी नाही

वैजापूर,२१ डिसेंबर / प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यातील शिरसगाव येथे शालेय विद्यार्थ्यांना  सोडून आलेल्या वैजापूर आगाराच्या बसने अचानक पेट घेतला. ड्रायव्हर व कंडक्टरने प्रसंगावधान राखून बस उभी केली व नागरिकांच्या सहाय्याने आग विझवण्यात आली. बुधवारी (ता.21) सायंकाळी वैजापूर – गंगापूर रस्त्यावर ही घटना घडली. सुदैवाने हानी झाली नाही.

बसला आग लागल्याचे लक्षात येताच बस ड्रायव्हर  व कंडक्टरने प्रसंगावधान राखून वैजापूर- गंगापूर रस्त्यावरील विठ्ठल ट्रॅक्टर एजन्सी समोर बस आणून उभी केली. आणि ताबडतोब आग रोधक गॅसने पेटलेल्या बसला नागरिकांच्या सहाय्याने वेळीच विझवले. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या आगरसायगावचे सरपंच भगतसिंग राजपूत, शिवसेनेचे कार्यकर्ते पाशु भाई फिटर, सोहेल आणि इमरान फिटर, भाजपचे सतीश पाटील शिंदे आदींनी बस विझवण्यासाठी मदत केली. यावेळी बस मधील दोन प्रवाशांना सुरक्षित बस मधून बाहेर उतरविण्यात आले.