नांदेडला जोडणाऱ्या पूर्णा, हिंगोली रस्त्यांसाठी १९२ कोटींचा निधी: नांदेड शहरातील रस्ते विकासासाठी शंभर कोटींचा निधी

नांदेडच्या विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Image

नांदेड ,​८​ ऑगस्ट /प्रतिनिधी :- नांदेड महानगराच्या विस्तारामुळे उत्तर नांदेड अर्थात तरोडा, वाडी या भागाचे मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. अर्ध्या तासाच्या अंतरावर पूर्णासारखे मोठे रेल्वे जंक्शन, वसमतसारखी मोठी कृषि बाजारपेठ व इतर कृषि क्षेत्रात परिपूर्ण असलेल्या गावांचे अंतर लक्षात घेता पूर्णा, हिंगोली रस्ते विकासासाठी भरीव तरतूद केलेली आहे. नांदेडला जोडणाऱ्या पूर्णा, हिंगोली रस्त्यांसाठी 192 कोटींच्या निधीतून या भागातील वाहतूक सुलभतेसाठी मोठी सुविधा निर्माण होत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

नांदेड महापालिकेअंतर्गत शहरातील उत्तर मतदारसंघातील मूलभूत सुविधा, हिंगोली जिल्हा सीमा ते आलेगाव-निळा-नांदेड व परभणी जिल्हा सीमा ते पूर्णा नांदेड रस्त्याचे दुपदरीकरण, आसना नदीवरील पासदगाव जवळील नवीन पुलाच्या कामाचे प्रातिनिधीक भूमिपूजन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.आमदार बालाजी कल्याणकर यांच्या मतदारसंघातील चार विकासकामांचे भूमीपूजन याप्रसंगी करण्यात आले. येथील भक्ती लॉन्स येथे झालेल्या या प्रातिनिधीक भूमिपूजन समारंभास खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता गजेंद्र राजपूत व इतर मान्यवर उपस्थित होते.

Image

पासदगावजवळील पूल हा दरवर्षी पुराच्या पाण्याने वेढला जातो. पुलावरून मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी वाहत असल्याने ते ओसरेपर्यंत या रस्त्यावरची वाहतूक खोळंबून राहते. सध्या आहे त्या पुलाऐवजी नवीन पुलाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होती. राज्य शासनाच्या हायब्रीड ॲन्युटी धोरणाअंतर्गत परभणी जिल्ह्यातून नांदेडकडे येणाऱ्या पोखर्णी (परभणी)-बोरवड-लिंबाळा-ताडकळस-पूर्णा ते नांदेड या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर आहे. हा रस्ता नांदेड जिल्हा सीमेपर्यंत आहे. मात्र या सीमेपासून नांदेड शहरापर्यंत रस्ता अधिक चांगला होणे बाकी होते. याचीही सुधारणा करणे व हायब्रिड ॲन्युइटीच्या धर्तीवर हा उरलेला मार्गही पूर्ण करणे आवश्यक होते. याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातून नांदेडकडे येणाऱ्या उमरा-सोडेगाव-बोल्डा-कुरुंदा-वसमत ते नांदेड हा जिल्हा सीमा रस्ता प्रगतीपथावर आहे. याही रस्त्याचे काम नांदेडच्या जिल्हा सीमेपर्यंत मर्यादित होते. नांदेड शहर याला चांगल्या मार्गाने जोडल्या न गेल्यामुळे या वाहतुकीला मोठा आडथळा निर्माण झाला होता. याची सुधारणा करणे अत्यंत आवश्यक होते. या तीनही कामांमुळे वाहतूक सुविधेत मोठी सुलभता आता येणार आहे.