2019 चा जीवनरक्षा पदक पुरस्कार पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते प्रदान

नांदेड दि. 5 :- नायगाव तालुक्यातील मांजरम येथील शिवराज रामचंद्र भंडारवाड यांना सन 2019 चा जीवनरक्षा पदक पुरस्कार घोषित झाला आहे. इयत्ता 10 मध्ये शिकणाऱ्या या बालविराने स्वत:च्या जीवाचा पर्वा न करता जिगरबाज कामगिरीने पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या दोन व्यक्ती व 40 शेळयांचा जीव वाचविण्याचे शौर्य दाखविले आहे. या बालविराला हा पुरस्कार आज डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवनात पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.

या पुरस्कार वितरणाच्या वेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.सचिन खल्लाळ, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर.पी. काळम, सहाय्यक लेखा अधिकारी, जी.आर. धुमे, परिविक्षा अधिकारी बी.पी. बडवणे यांची उपस्थिती होती.

भारत सरकार, केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जीवनरक्षा पदक पुरस्कार शिवराज रामचंद्र भंडारवाड यांना घोषित झालेला होता. या पुरस्काराचे स्वरुप सन्मानपत्र, पदक व 1 लाख रुपयाचा धनादेश असे आहे. हा पुरस्कार ज्या मुलांनी शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, नाविण्यपुर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपुर्ण कामगिरी केलेली आहे, त्यांना दिला जातो. त्यांच्या या धाडसाचे कौतुक व्हावे व समाजातील इतर बालकांनाही त्याच्यापासून प्रेरणा मिळावी म्हणून हा पुरस्कार महत्वाचा आहे.