मुंबई उच्च न्यायालयात नऊ अतिरिक्त न्यायमूर्तींची निवड

औरंगाबाद खंडपीठातील वकील किशोर संत होणार न्यायमूर्ती 

नवी दिल्ली / मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या कोलिजीअमने अतिरिक्त न्यायमूर्तींच्या नावाची शिफारसीनुसार मुंबई उच्च न्यायालयात नऊ अतिरिक्त न्यायमूर्तींची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची संख्या ५४ वरून ६३ झाली आहे.

केंद्रीय विधी व न्यायमंत्री किरेन रिजीजू यांनी शनिवारी याबाबतची अधिसूचना जारी करत अतिरिक्त न्यायमूर्तींच्या निवडीला मंजुरी दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या कोलिजीअमने अतिरिक्त न्यायमूर्ती पदासाठी ॲड. किशोर संत, ॲड. वाल्मीकी मेन्झेस, ॲड. कमल खटा, ॲड. शर्मिला देशमुख, ॲड. अरुण पेडणेकर, ॲड. संदीप मारने, ॲड. गौरी गोडसे, ॲड. राजेश पाटील आणि ॲड. आरीफ डॉक्टर यांच्या नावाची शिफारस केली होती.

त्या नावांना केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी मंजुरी दिली. मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्तींची ९४ पदे असून सध्या ४५ कायमस्वरूपी व नऊ अतिरिक्त न्यायमूर्ती कार्यरत आहेत.