साहित्यिक डाॅ.सुहास जेवळीकर यांचे निधन

औरंगाबाद,२७ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- साहित्यिक आणि औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील भूलतज्ज्ञ विभागाचे माजी विभाग प्रमुख डाॅ.सुहास जेवळीकर यांचे काल रात्री उशीरा दीर्घ आजारानंतर निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 66 वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी आणि जावई असा परिवार आहे

डाॅ. जेवळीकर यांचे एमबीबीएस, एमडीचे शिक्षण औरंगाबादेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झाले. या महाविद्यालयातून भूलतज्ज्ञ विभागाचे विभाग प्रमुख म्हणून काही वर्षांपूर्वी ते सेवानिवृत्त झाले.घाटी रूग्णालयाचे अधीक्षक म्हणूनही त्यांनी प्रभावीपणे काम केले.याच रूग्णालयात गेल्या काही दिवसांपासून ते उपचार घेत होते. अखेर काल रात्री त्यांनी उशीरा रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

डाॅ जेवळीकर हे मराठीतील प्रख्यात लेखक होते. त्यांची ऐरणीच्या देवा, सभोवार, स्वास्थसंवाद,तिरीप, दहशतीची दैनंदिनी (कवितासंग्रह) ही पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांना राज्य शासनाचा वाङ्मयीन पुरस्कार, आपटे वाचन मंदिर, इचलकरंजीच्या वतीने दिला जाणारा इंदिरा संत पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले होते.