वैजापूर-औरंगाबाद रस्त्यावर शिवराई फाट्याजवळ लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रकला अपघात ; 4 ठार तर 30 जण जखमी
जफर ए.खान
वैजापूर ,३१ जानेवारी :- जालना जिल्ह्यातील मंठा येथून नाशिककडे जाणाऱ्या लग्नाच्या वऱ्हाडाची आयशर ट्रक व समोरून येणाऱ्या ट्रकची धडक होऊन झालेल्या अपघात 4 जण ठार तर 30 जण जखमी झाले. वैजापूर- औरंगाबाद रस्त्यावर शिवराई फाट्याजवळ रविवारी रात्री 2 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
अविनाश पंडित मोरे रा.गौतमनगर, अंबड (नाशिक) यांचा भाऊ वैभव मोरे याचे रविवारी (ता.30) जालना जिल्ह्यातील हातवण (ता.मंठा) येथे लग्न होते. लग्न सोहळा आटोपून वऱ्हाडी मंडळी सायंकाळी सातच्या सुमारास आयशर ट्रक (क्र. एम.एच.15 एफ.व्ही. 4214) ने परत नाशिकला येण्यासाठी निघाले असता रात्री अडीचच्या सुमारास औरंगाबाद – वैजापूर रस्त्यावरील शिवराई गावाजवळ समोरून येणाऱ्या आयशर ट्रकने (क्र. एम.एच.15 डि.के. 8409) धडक दिल्याने मोठा आवाज होऊन वऱ्हाडी मंडळींचा आयशर ट्रक पलटी झाला.त्यामुळे एकच आरडाओरड सुरू झाली. या भीषण अपघातात कविता आबासाहेब वडमारे(40 वर्ष), प्रज्ञा गौतम गायकवाड (17 वर्ष), ललिता पुंडलिक पवार (45 वर्ष) व मोनू दीपक वाहूळे (8 वर्ष) सर्व रा.अंबड औद्योगिक वसाहत परिसर, नाशिक हे चार जण ठार झाले तर 30 जण जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच आ.रमेश पाटील बोरणारे, उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास प्रजापती, पोलीस निरीक्षक साम्राटसिंग राजपूत, संजय बोरणारे, रणजीत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक रमेश जाधवर, श्रीराम काळे, पोलीस नाईक संजय घुगे, मोईस बेग,विजय भटकर, रज्जाक शेख, योगेश वाघमोडे,प्रशांत गीते व अमोल मोटे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन रुग्णांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
अविनाश पंडित मोरे रा.अंबड (नाशिक) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आयशर ट्रक क्र. एम.एच.15 डी.के.8409 च्या चालकाविरुध्द वैजापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.