विद्यार्थिनीला कृपानने गळा चिरून हत्या केल्याप्रकरणी आरोपी शरणसिंगची रवानगी हर्सूल जेलमध्ये
औरंगाबाद ,३ जून /प्रतिनिधी :-
देवगिरी महाविद्यालयात शिकणाऱ्या १९ वर्षीय विद्यार्थिनीला एकतर्फी प्रेमातून धारधार कृपानने भरदिवसा गळा चिरून हत्या केल्याप्रकरणी आरोपी शरणसिंग सविंदरसिंग सेठी (२०, रा. भिमपुरा) याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश प्रभारी मुख्य न्यायदंडाधिकारी एस.डी. पंजवानी यांनी गुरुवारी दि.२ जून रोजी दिले.
एकतर्फी प्रेमातून शरणसिंग सेठी या युवकाने २१ मे रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास मयत कशीश हिच्या सोबत रचनाकार कॉलनी भागातील कॅफे इमोजी येथे कॉफी घेतली. कॉफी घेतल्यानंतर शरणसिंग हा कॅफेचा बाहेर आला. कॅफेहून कशीशला बोलण्यासाठी दोनशे फुट अंतरावर घेऊन गेला. त्या ठिकाणी एका खुल्या प्लॉटवर कशीश हिचा धारदार हत्याराने गळा चिरून हत्या करण्यात आली. घटनास्थळी मदतीसाठी कशीशच्या मैत्रीणीवरही त्याला हल्ला केला होता. मयत सुखप्रीत कौर ऊर्फ कशीश (१८) हिचा भाऊ हरप्रित सिंग प्रितपाल सिंग ग्रंथी (२४) याने दिलेल्या फिर्यादीवरुन वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करुन शरणसिंग सेठी याला नाशिक येथील लासलगाव येथून अटक केली. तर न्यायालयाने त्याला आजपर्यंत कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडी दरम्यान आरोपीचे रक्ताने माखलेले कपडे आणि धारदार हत्यार पोलिसांनी जप्त केले. तत्पूर्वी खुनाच्या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस आयुक्तांनी तपास विशेष पथकाकडे वर्ग केला आहे.