पर्यावरणाच्या दृष्टीने औरंगाबाद शहरात डबलडेकर इलेक्ट्रिक बसची आवश्यकता – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

Displaying _DSC5963.JPG

औरंगाबाद, २६ जानेवारी / प्रतिनिधी :- महानगर पालिका स्मार्ट सिटी अंतर्गत औरंगाबाद शहराच्या पायाभूत सोयीसुविधा विकसीत करण्याचे काम उत्तमरित्या करत असून यामध्ये नागरिकांच्या आणि पर्यावरणाच्या दृष्टीने उपयुक्त डबलडेकर इलेक्ट्रिक बससारख्या पर्यावरणपुरक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यावर महानगर पालिकेने भर देण्याची सूचना  पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज येथे दिली.

Displaying _DSC5915.JPG

स्मार्ट सिटी कार्यालयाच्या आयोजित महानगर पालिकेच्या विकास कामांच्या आढावा बैठकीत श्री.ठाकरे बोलत होते. यावेळी पालकमंत्री सुभाष देसाई, आमदार अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, मनपा प्रशासक अस्तिककुमार पाण्डेय, मनपाचे अतिरिक्त आयुक्त बी.बी.नेमाने, मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ.पारस मंडलेचा यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Displaying _DSC5907.JPG

मुंबईच्या धर्तीवर शहरात पर्यावरणपुरक अशा डबलडेकर इलेक्ट्रिक बस दाखल झाल्यास प्रवास क्षमता दुपटीने वाढून खर्चात कपात होईल. याकरिता महानगर पालिकेने पर्यावरणपुरक अशा या बस करीता लागणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याबाबत भर द्यावा. जेणेकरुन विकासाच्या दृष्टीने शहराच्या चिरंतन वाढीसाठी ही संकल्पना नक्कीच उपयोगी ठरेल असे सांगून क्रांतीचौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणीचे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना श्री.ठाकरे यांनी दिल्या. तत्पूर्वी त्यांनी शहरातील वातावरणीय बदल या संदर्भातील डब्लुआरआयचे कार्यक्रम अधिकारी आशा ढवल यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेतली. त्याचबरोबर औरंगाबाद शहरात होत असलेले वातावरणातील बदल यासंदर्भात सविस्तर चर्चा केली. यावेळी पालकमंत्री श्री.देसाई यांनी पर्याव्रण पुरक वाहतूक व्यवस्थेसंदर्भात विविध सूचना केल्या.

यावेळी मनपा आयुक्त अस्तिककुमार पाण्डेय यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृतीवन, सफारी पार्क, पाणीपुरवठा योजना, घनकचरा व्यवस्थापन, रस्ते, स्मार्ट बस, नेहरू भवन पुर्नविकास, माझी वसुंधरा, लाईट हाऊस, शहर विकास योजना, गुंठवारी विकास अधिनियम, ऐतिहासिक दरवाजे संवंर्धन, डॉ.सलीम अली तलाव संवर्धन, आरोग्य आदींसंदर्भात्‍ संगणकीय सादरीकरण केले.

Displaying _DSC5929.JPG

पर्यटन स्थळे अद्यावत सोईसुविधायुक्त करण्यावर भर- पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे

पर्यटन क्षेत्रात महाराष्ट्राचे महत्वपूर्ण स्थान असून अजिंठा, वेरुळ या जागतिक पर्यटन स्थळांमुळे औरंगाबाद विभाग महत्वपूर्ण ठरतो, त्यादृष्टीने औरंगाबाद येथे अद्यावत सोईसुविधायुक्त पर्यटन स्थळांचा सर्वांगिण विकास करण्याच्या सूचना पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज येथे दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित मराठवाड्यातील पर्यटन स्थळांच्या विकासा संदर्भात आढावा बैठकीत श्री.ठाकरे बोलत होते. यावेळी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खासदार इम्तियाज जलील, आमदार अंबादास दानवे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस अधीक्षक निमित गोयल, पर्यटन विभागचे संचालक मिलिंद बोरीकर, पर्यटन उपसंचालक औरंगाबाद श्रीमंत हारकर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक चंद्रशेखर जैस्वाल, सहसंचालक विजय जाधव, यांच्यासह विभागातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पर्यटन विभागचे अधिकारी  यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत श्री.ठाकरे यांनी सर्व जिल्ह्यांतील पर्यटन विकास योनजेअंतर्गत मंजूर कामे, प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत पर्यटन विकासासाठी असलेल्या निधीच्या मागणी संदर्भात तसेच पर्यटन विकासाच्या प्रस्तावित कामांची माहिती घेतली. औरंगाबाद विभागातील ऐतिहासिक स्थळे, जागतिकदृष्ट्या महत्वाची वारसा स्थळे यांच्या विकासात तसेच पर्यटन वृध्दीसाठी आधुनिक तंत्रज्ञाचा वापर करावा. पर्यटनस्थळांपर्यंत पोहचण्यासाठी चांगले रस्ते, परिवहन व्यवस्था, निवासव्यवस्था, उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा असण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना श्री.ठाकरे यांनी केल्या.

यावेळी विभागातील विविध पर्यटनस्थळांसंदर्भात तसेच राज्यमंत्री श्री.सत्तार यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येणाऱ्या शिवपार्क व भीमपार्कच्या आराखड्याचे व्हिडीओद्वारे सादरीकरण करण्यात आले. श्री.सत्तार यांनी अंजिठा या जागतिक पर्यटन स्थळी अद्यावत सोयीसुविधा आणि पुरक विकास कामे गतीमानतेने होणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी खासदार इम्तियाज जलील यांनी पर्यटकांना निवासाची तसेच जेवणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी हॉटेल 11 वाजेपर्यत सुरू ठेवण्याची सूचना केली. तर आमदार अंबादास दानवे यांनी वेरुळ येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-211 महामार्गाला जोडण्याची सूचना केली. दौलताबाद किल्ला परिसरातील गर्दी, वाहतुक कोंडी दूर करण्यासाठी पर्यायी रस्त्याचा आराखडा एमटीडीसीद्वारे तयार करण्यात आला असून प्रत्यक्ष पाहणी तसेच अंजिठा, वेरुळ येथील शिवपार्क, भीमपार्क प्रकल्पाच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचे श्री.ठाकरे यांनी सांगितले.

“माझी वसुंधरा” अभियानात लोकसहभाग वाढवावा– पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

बदलत्या वातावरणामध्ये सुरक्षित राहण्यासाठी पृथ्वीचे तापमान आणि पर्यावरणाचे जतन करणे गरजेचे आहे. त्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या “माझी वसुंधरा अभियानात” लोकसहभाग वाढवण्याच्या सूचना पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज येथे दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित “माझी वसुंधरा” अभियानाच्या आढावा बैठकीत श्री.ठाकरे बोलत होते. यावेळी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खासदार इम्तियाज जलील, आमदार अंबादास दानवे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्यासह संबंधित अधिकारी तसेच दुरदृश्यप्रणालीद्वारे विभागातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह सर्व संबंधित यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.

            श्री.ठाकरे यांनी औरंगाबाद विभागात या अभियांनातंर्गत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती घेऊन विभागातील सर्व जिल्हे उत्तम काम करत असल्याबाबत समाधान व्यक्त्‍ करुन सर्व यंत्रणांचे अभिनंदन केले. कोविडच्या दुसऱ्या लाटेचा सामाना करत असतानाच्या काळातही आठ महिन्यांत उल्लेखनीय काम या अभियानातंर्गत झाले आहे. सर्व जिल्ह्यांकडून त्याचपध्दतीने पुढील वर्षातही भरीव काम अपेक्षित आहे. जलसंधारण, वृक्षारोपण, सोलारचा वाढता वापर, यासह विविध पर्यावरणपुरक उपक्रम जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, आयुक्त, लोकप्रतिनिधी या सर्वांनी परस्पर सहकार्याने जबाबदारीच्या भूमिकेतून राबविणे आवश्यक आहे. बदलत्या पर्यावरणीय वातावरणात टिकाव धरुन राहण्यासाठी जीवीत संरक्षणाला पुरक वातावरण कायम ठेवणे ही काळाची गरज बनली आहे. त्या दृष्टीने  या अभियानाची व्याप्ती वाढवत असतांना त्यामध्ये लोकांचा सक्रीय सहभाग महत्वाचा असल्याचे सूचित करुन श्री.ठाकरे यांनी जनमाणसात माझ्या स्वत:साठी मी काय करु शकतो याबाबत जागरुकता निर्माण होणे गरजेचे असून त्या दृष्टीने वसुंधरेची सुरक्षा म्हणजे आपली सुरक्षा ही जाणीव राज्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवायची आहे. असे सांगून श्री.ठाकरे यांनी स्वच्छ हवा व पाणी कायम मिळवण्यासाठी शाश्वत विकासावर शासनाचा भर आहे. माझी वसुंधरा अभियानातंर्गत केलेल्या कामामुळे जागतिक पातळीवर महाराष्ट्राला पुरस्कार मिळाला आहे. जगभरात या संदर्भातील कामात महाराष्ट्राचा उल्लेख होणे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. त्या प्रेरणेतून आपल्याला अवकाळी पाऊस, गारपीट, दुष्काळ, वादळ या वातावरणीय बदलातून उद्भवणाऱ्या आणि प्रामुख्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान करणाऱ्या नैसर्गिक संकटांवर मात करायची आहे. त्यासाठी पर्यावरणाचे जतन, समतोल अत्यंत महत्वाचा आहे. हे लक्षात घेऊन जनसहभागासह सर्व यंत्रणांना सोबत घेऊन येत्या वर्षात वनक्षेत्रफळात वाढ करण्यावर भर द्यायचा आहे. असे सूचित करुन श्री.ठाकरे यांनी पर्यावरण संरक्षणासाठी राबवावयाच्या उपक्रमांमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पनांचे स्वागत असून पर्यावरण खात्यामार्फत या कामासाठी आवश्यक सहकार्य मिळेल असे यावेळी सांगितले.

            औरंगाबाद विभागात विभागीय आयुक्त्‍ सुनील केंद्रेकर यांच्या मार्गदर्शनात महसून, वन, नगर विकास, ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम विभाग यासह इतर सर्व संबंधित विभागांच्या एकत्रित प्रयत्नातून बांबु लागवड, सोलार वेस्ट मॅनेजमेंट, वृक्ष लागवड, जलसंधारण, पाण्याचा पुर्नवापर, अटल वन, यासह माझी वसुंधरा अभियानातंर्गत्‍ विविध उपक्रमांद्वारे सर्व जिल्ह्यांमध्ये उल्लेखनीय काम होत आहे. विभागात 2026 ठिकाणी घनवन उपक्रमांतर्गत्‍ 2020-21 मध्ये 73 लाखांपेक्षा जास्त झाडे लावण्यात आली. तसेच प्रतिव्यक्ती तीन झाडे या अंतर्गत 1 कोटी 75 लाख वृक्षारोपण विभागात करण्यात आले. त्याचप्रमाणे विभागीय आयुक्त कार्यालयात 700 रोपांची नर्सरी विकसीत करण्यात आली असल्याचे उपायुक्त (रोहयो) समीक्षा चंद्राकार यांनी सांगितले. पैठण, अंबाजोगाई, पैठण, उदगीर, बीड, लातूर, परभणी यांसह विभागात सर्व जिल्ह्यात प्रभावीपणे या अभियानाची अंमलबजावणी सुरू आहे. तसेच विविध ठिकाणी अंगणवाडी परिसरात पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विविध ठिकाणी पाणवठे तयार करण्याचे काम करण्यात येत असून शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना अवकाश, वन्यजीवां बद्दलची माहिती देण्याच्या दृष्टीने ॲस्ट्रॉनॉमी क्लब, वाईल्ड लाईफ क्लब, सुरू करण्याचे नियोजन असल्याची माहिती वीणा सुपेकर, यांनी यावेळी दिली. विविध जिल्ह्यांमध्ये माझी वसुंधरा अभियानातंर्गत राबविण्यात येत असलेल्या कामांची सविस्तर माहिती दुरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झालेल्या जिल्हाधिकारी आणि यंत्रणा प्रमुख यांनी दिली.