भाजपला धक्का; माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांचा राजीनामा

औरंगाबाद ,दि . १७ :-विधानपरिषदेच्या पदवीधर निवडणुकीवरुन भाजपमध्येही नाराजीनाट्य रंगले आहे. माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यानंतर भाजपला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी न मिळाल्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना राजीनामा पाठवून त्यांनी भाजप पक्षाचा त्याग केला. उत्तर महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीचे घड्याळ हाती घेतले होते. त्यानंतर मराठवाड्यातील या मोठ्या नेत्याने पक्षाला रामराम ठोकल्यामुळे विधानपरिषदेच्या निवडणुकीचे गणित बदलू शकते.

राजीनामा दिल्यानंतर जयसिंगराव म्हणाले की, “मी अनेकवर्षांपासून पक्षाकडे नवीन जबाबदारी मागत होतो. अनेकवेळेला संबंधित नेत्यांना फोनही केले. मात्र माझा फोन घेतला जात नाही. मी पाठविलेल्या ईमेलला रिप्लाय देखील दिला नाही. मग पक्षात राहून मी काय करु? मराठवाड्यात मुंडे आणि महाजन यांच्यानंतर पक्षवाढीसाठी मी प्रयत्न केले. मात्र आता मला सन्मानाची वागणूक दिली जात नाही, त्यामुळेच मी पक्षाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.”

बीड लोकसभा मतदारसंघातून ते ​२​ वेळा लोकसभेवर खासदार म्हणून निवडून आले होते. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून देखील त्यांनी 2 वेळा यश प्राप्त केले होते. राज्य मंत्रिमंडळात सहकार राज्यमंत्रिपद देखील त्यांच्याकडे होते. केंद्रीय मंत्रिमंडळात शिक्षण व खाण राज्यमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली होती.जयसिंगराव गायकवाड हे जनसंघापासून भाजपमध्ये कार्यरत होते. मराठवाड्यात पक्षाच्या विस्तारासाठी त्यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत काम केले आहे. ​ गायकवाड हे सध्या भाजपच्या प्रदेश कार्यसमितीचे सदस्य होते. पण, गेल्या काही ​वर्षांपासून ​ ते सक्रिय राजकारणातून बाहेर फेकेले गेले होते.​