छगन भुजबळ महाराष्ट्राला लागलेला कलंक, बीडची दंगल यांनीच घडवली; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर आरोप

छत्रपती संभाजीनगर,१३ डिसेंबर / प्रतिनिधी :-छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यात आरक्षणावरुन सुरु झालेली लढाई आता व्यक्तीगत होताना दिसत आहे. छगन भुजबळ महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. याला फक्त पाहुण्याचा पुळका येतो. अंतरवलीतील लोक घरात कोंडून मारले, तेव्हा हा झोपला होता का? भेदभाव करत नाही तर मग अंतरवलीत का आला नाही? असा हल्लाबोल मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर केला आहे.बीडची दंगल छगन भुजबळ यांनीच घडवून आणली. याला बळ देऊ नका,असं आवाहन देखील त्यांनी राज्य सरकारला केलं आहे. आज छत्रपती संभाजीनगर येथे केलेल्या भाषणात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले मनोज जरांगे?

छगन भुजबळ यांना बळ देऊन मराठ्यांच्या विरोधात जाऊ नका, यांचं एकूण तुम्ही आमच्या लोकांना अटक केली. यांचं ऐकून मराठ्यांचं वाटोळं करु नका. भुजबळांनी महाराष्ट्र सदन खाल्लं, तरी केस तुम्ही मागे घ्यायला लागलेत. सगळा महाराष्ट्र खाल्ला आहे. फडणवीस साहेब भुजबळांना बळ द्यायला लागले असं दिसत आहे.भुजबळ बोलला त्यामुळे गावागावात तणाव निर्माण होत आहे, असं जरांगे म्हणाले.

आम्ही शांतते आवाहन करतो आणि तुम्ही लोकांना भडकवतात. तुम्ही जर असंच करत राहिले तर आम्हाला मोठं आंदोलन उभं करावं लागेल. हे मराठ्यांच्या किती हिताचं आहे हे मराठ्यांना माहिती आहे.सगळं खाल्लं. फडणवीस साहेब याला बळ देत असल्याने हा भाजपसाठी चांगला संदेश नाही.आरक्षण ही केंद्र आणि राज्याची सुविधा आहे. यांचं ऐकू नये. हा माणूस प्युअर जातीयवादी आहे. हा लहान जातींना देखील आरक्षण खाऊ देत नाही, असा आरोप जरांगे यांनी केला.