समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यास सरकार अपयशी-विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची सरकारवर टीका

घटनेची चौकशी करून दोषी कारवाई करावी – अंबादास दानवे

वैजापूर,१५ ऑक्टोबर  /प्रतिनिधी :-समृद्धी महामार्गावर सतत घडणाऱ्या अपघातातून राज्य शासनाने कसलाही बोध घेतला नाही.संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहराजवळ समृद्धी महामार्गावर घडलेला अपघात नसून व्यवस्थात्मक पद्धतीने हत्या असून समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यास सरकार स्पशेल अपयशी ठरले असल्याची टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

आज रात्री घडलेल्या अपघाताची दानवे यांनी सर्वप्रथम घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच जखमींची घाटी रुग्णालयात जाऊन विचारपूस केली व या घटनेचा आढावा घेतला.
सदर घटनेस परिवहन विभाग जबाबदार असुन १७ जणांची क्षमता असताना ३५ ते ४० प्रवासी या ट्रॅव्हल्स मध्ये प्रवास कसा काय करत होते असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

बुलढाणा येथे काही महिन्यांपूर्वी असाच मोठा अपघात घडला होता,त्यानंतर या घटनेची तीव्रता लक्षात घेत परिवहन विभागाने समृद्धी वरून जाणाऱ्या गाड्यांची तपासणी करणे सुरू केले होते.परंतु लगेच ८ दिवसानंतर पुन्हा काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे हफ्तेखोरी साठी ही पध्दत बंद पडल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.या अपघातासाठी दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कडक कार्यवाही करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

तसेच सरकारला नागरिकांचे जीव स्वस्त वाटत आहेत का? समृद्धी महामार्गावर सतत लोकांचे बळी जात आहेत. याचे सरकारला गांभीर्य नाही का ? असे हफ्ते खोरीसाठी वाहने थांबवून लोकांचे बळी घेतलेत जात असेल तर ही खूप गंभीर बाब असल्याचे म्हणत दानवे यांनी व्यवस्थापनाच्या गलथान कारभारावर बोट ठेवले.

दररोजच कोण – कोणत्या गोष्टींवर सरकारचा निषेध करावा. सर्वच बाबतीत सरकारी पातळीवरून असा हलगर्जीपणा होत आहे. तसेच समृद्धी महामार्गाची सुरक्षितता व अत्यावश्यक सुविधा वाढविणे गरजेचे आहे.सदरील रस्ता जलद प्रवासासाठी आहे तर या वाहनाला का थांबविले गेले? याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही दानवे यांनी केली आहे.