‘एकदा काय झालं’ या चित्रपटाला सर्वोत्तम मराठीसाठी, तर ‘गोदावरी’ला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर

६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा

सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुष्पा भाऊ, तर अभिनेत्री म्हणून गंगूबाई काठियावाडी आणि क्रिती सेनन

 नवी दिल्ली, 24 :  ‘ एकदा काय झालं ’ या चित्रपटाला मराठी भाषेतील सर्वोत्तम चित्रपटाचा तर ‘गोदावरी’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनसाठी पुरस्कार जाहीर झाला.  यासह नॉन फिचर फिल्म श्रेणीतील विशेष परीक्षक पुरस्कार ‘रेखा’या मराठी चित्रपटाला, तर सामाजिक विषयांवरील नॉन फिचर फिल्मसाठी  ‘थ्री टू वन ’ या मराठी आणि हिंदी भाषेतील चित्रपटाला जाहीर झाला.    

            येथील नॅशनल मीडिया सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत वर्ष 2021 करिताच्या 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. याप्रसंगी माहिती प्रसारण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव नीरजा शेखर, चित्रपट लेखन परीक्षक समितीचे अध्यक्ष यतिंद्र मिश्रा, नॉन फिचर फिल्म परीक्षक समितीचे अध्यक्ष वसंथ साई, चित्रपट परीक्षक समितीचे अध्यक्ष केतन मेहता यांनी विविध श्रेणीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांची  घोषणा केली.

            फिचर फिल्ममध्ये विविध 32  श्रेणीत पुरस्कार जाहीर झालेले आहेत. यात विविध भाषेतील उत्कृष्ट चित्रपटांचाही समावेश आहे. नॉन फिचर फिल्ममध्ये विविध 24 श्रेणीमध्ये पुरस्कार जाहीर झाले.

चंद्रकांत कुलकर्णी निर्मित आणि प्रतिमा जोशी दिग्दर्शित ‘चंद सासे’ या शॉर्टफिल्मला कौटुंबिक सिनेमा पुरस्कार घोषित झाला आहे.

दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जून याला पुष्पा या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून गौरवण्यात आलं आह. तर अभिनेत्री आलिया भट्टला गंगूबाई काठियावाडी साठी तर अभिनेत्री क्रिती सेननला मीमी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरवण्यात आलं आहे.

‘एकदा काय झालं’ ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

            वर्ष 2021 मध्ये मराठी भाषेमधून ‘एकदा काय झालं’ हा चित्रपट  सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला. वडील आणि मुलाच्या नात्यातील सुंदर आणि हळवा प्रवास चित्रपटातून दाखविण्यात आलेला आहे. या चित्रपटाला रजत कमल पुरस्कार जाहीर झाला असून  निर्माता गजवंदना शो बॉक्स एलएलपी, तर दिग्दर्शक सलील कुलकर्णी हे आहेत.

            ‘गोदावरी (द होली वॉटर)’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार जाहीर झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन निखिल महाजन यांनी केले. पुरस्काराचे स्वरूप स्वर्ण कमळ,  2 लाख 50 हजार रोख असे आहे.

            नॉन फिचर फिल्म श्रेणीतील सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘थ्री टू वन’  या हिंदी आणि मराठी दोन्ही भाषेत असणाऱ्या चित्रपटाला जाहीर झालेला आहे.  हा पुरस्कार संयुक्तरीत्या ‘मिठू’  सोबत मिळालेला आहे. ‘थ्री टू वन’ या चित्रपटाची निर्मिती एफटीआयआय ची असून दिग्दर्शक हिमांशू प्रजापती आहेत. पुरस्काराचे स्वरुप रजत कमल आणि प्रत्येकी 50 हजार रूपये रोख आहे.

             ‘रेखा’ या मराठी नॉन फिचर फिल्मला विशेष परीक्षक श्रेणीतील पुरस्कार जाहीर झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शेखर बापू रणखांबे यांनी केले आहे. पुरस्काराचे स्वरूप रजत कमल आणि 1 लाख रूपये रोख आहे.

            हिंदीमधील सर्वोत्कृष्ट चित्रपट ‘सरदार उधम’ हा ठरला.  2021 यावर्षीच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये दक्ष‍िणेतील चित्रपट अधिक दिसून आले असून उत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार ‘पुष्पा’ या तेलगु चित्रपटासाठी अल्लू अर्जूनला जाहीर झाला आहे. उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार 2 अभिनेत्रींना विभागून मिळणार आहे. ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटासाठी आलिया भट तर ‘मिमी’ या चित्रपटसाठी क्रिती सेनॉन यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. उत्कृष्ट सहअभिनेत्याचा पुरस्कार ‘मिमी’ या हिंदी सिनेमासाठी पंकज त्रिपाठी तर उत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार  पल्लवी जोशी यांना ‘द कश्मीर  फाइल्स’ या चित्रपटासाठी जाहीर झाला आहे.

            सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘रॉकेट्री : द नांबी इफेक्ट’ अंतराळ वैज्ञानिकावर आधारित असणाऱ्या चित्रपटाला जाहीर झाला आहे. संपूर्ण मनोरंजन या श्रेणीतील  पुरस्कार ‘आर आर आर’ या तेलुग चित्रपटाला जाहीर झालेला आहे. नर्गिस दत्त राष्ट्रीय एकात्मता या श्रेणीतील पुरस्कार ‘द कश्म‍ीर फाइल्स’ या हिंदी चित्रपटाला जाहीर झालेला आहे.

            चित्रसृष्टीतील एकूण उत्कृष्ट कारकिर्दीसाठी देण्यात येणारा ‘दादासाहेब फाळके’ राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा नंतर करणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन

मुंबई, दि. २४ : राष्ट्रीयस्तरावर प्रतिभेची मोहोर उमटवण्याची आपल्या चमकदार कामगिरीची परंपरा यंदाही मराठी चित्रपट क्षेत्राने कायम राखली आहे, याचा अभिमान आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये स्थान पटकावणाऱ्या चित्रपटांशी निगडीत सर्वच निर्माते-दिग्दर्शक, कलावंत, तंत्रज्ज्ञांचे कौतुक करून, त्यांचे अभिनंदन केले आहे.

            सन २०२१ करिताच्या ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘गोदावरी (दि होली वॉटर)’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाकरिता निखिल महाजन यांना उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार, ‘एकदा काय झालं’ या सलील कुलकर्णी दिग्दर्शित चित्रपटाला उत्कृष्ट मराठी चित्रपट, तर दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे यांच्या ‘रेखा’ चित्रपटाला परीक्षकांचा विशेष पुरस्कार मिळाला आहे.

            या सर्वांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, मराठी चित्रपटसृष्टीला गौरवशाली परंपरा आहे. कला क्षेत्रातील आधुनिक प्रवाह, तंत्रज्ञानाचे बदल आत्मसात करून मराठी चित्रपटांनी नेहमीच विषयांच्या हाताळणीत वैविध्य राखले आहे. त्यामुळेच राष्ट्रीय पुरस्कारांच्या यादीत मराठी चित्रपटांनी नेहमीच चमकदार कामगिरी नोंदवली आहे. हीच परंपरा यंदाही पुरस्कार पटकावणाऱ्या चित्रपटांचे निर्माते-दिग्दर्शक, कलावंत आणि तंत्रज्ज्ञ यांनी आपल्या सांघिक प्रयत्नातून कायम राखली आहे, हे महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. ही परंपरा कला क्षेत्रातील होतकरूंसाठी प्रेरणादायी ठरेल, असेही नमूद केले आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या श्री. महाजन यांचे देखील मुख्यमंत्र्यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

राष्ट्रीय पुरस्कारांमुळे राज्याच्या गौरवशाली परंपरेचा मराठमोळा ठसा अधिक ठळक झाला – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गौरवोद्गार

मुंबई :- आपली गुणवत्ता आणि वेगळेपणामुळे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या विविध गटांमध्ये बाजी मारणाऱ्या मराठी चित्रपट, निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. चित्रपटसृष्टीची जन्मभूमी असणाऱ्या महाराष्ट्राने या पुरस्कारांवर आपले नाव कोरून राज्याच्या गौरवशाली कला परंपरेचा मराठमोळा ठसा अधिक ठळक केला आहे, असे गौरवोद्गारही उपमुख्यमंत्र्यांनी काढले.

मनोरंजन विश्वातील प्रतिष्ठित पुरस्कार अर्थात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आज नवी दिल्ली येथे जाहीर करण्यात आले. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार म्हणाले की, यावेळच्या ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या यादीत देखील मराठी सिनेसृष्टीनं आपला दबदबा कायम राखला आहे, ही अतिशय अभिमानास्पद बाब आहे. अर्थपूर्ण विषय, विषयाचा सखोल अभ्यास, चित्रपट निर्मितीला आधुनिक तंत्रप्रणालीची जोड ह्या साऱ्यांची सांगड घालत अनेक दर्जेदार मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले, ही कौतुकाची बाब आहे.

यंदाच्या ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘गोदावरी (दि होली वॉटर)’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाकरिता निखिल महाजन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. ‘एकदा काय झालं’ या सलील कुलकर्णी दिग्दर्शित चित्रपटाला उत्कृष्ट मराठी चित्रपट आणि दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे यांच्या ‘रेखा’ चित्रपटाला परिक्षकांचा विशेष पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच सामाजिक विषयांवरील नॉन फिचर फिल्मसाठी ‘थ्री टू वन’ या मराठी आणि हिंदी भाषेतील चित्रपटाला पुरस्कार जाहीर झाला. या यशाबद्दल संबंधित चित्रपटांचे निर्माते-दिग्दर्शक, कलावंत, तंत्रज्ज्ञ आदी सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. मनोरंजन क्षेत्रातील आपलं वेगळेपण मराठी चित्रपटसृष्टी अशीच कायम अबाधित ठेवेल आणि आपल्या दमदार व चांगल्या मराठी चित्रपटांच्या निर्मितीच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीला असलेली गौरवशाली परंपरा निरंतर सुरु राहील, अशी आशा बाळगतो, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदनपर संदेशात म्हटले आहे.