उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात;एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा

खोक्यातून जन्मलेले सरकार न्याय देऊ शकत नाही : उद्धव ठाकरे

ठाणे, २९ जुलै /प्रतिनिधी :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ठाण्यामध्ये उत्तर भारतीयांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागच्या वर्षी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच ठाण्यात जाहीर कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमातून उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपवर निशाणा साधला.
स्वार्थाकरता कुटनिती केली जाते, चाणक्यनिती नाही. हिंदुत्वाचा अर्थ काय? मंदिरातील घंडा बडवणारं आमचं हिंदुत्व नाहीये, दहशतवाद्यांना बडवणारं हिंदुत्व आहे. मुंह मे राम, हात में काम असं आमचं हिंदुत्व आहे. यांचं हिंदुत्व खोटं आहे, यांचा मुखवटा आपल्याला फाडायचा आहे. बाबरी पडली तेव्हा भाजपवाले उंदराच्या बिळात घुसले होते. मी खुलेआम काँग्रेससोबत गेलो, अंधारात गेलो नाही. भाजपसोबत मजबूत युती होती ती भाजपनेच तोडली. तानाशाहीपुढे मी कधीच झुकणार नाही, असं टीकास्त्र उद्धव ठाकरेंनी भाजपवर सोडलं आहे.

भ्रष्टाचाऱ्यांसोबत पंतप्रधान बसणार आहेत, त्यांचा सत्कार करणार आहेत. राम मंदिराकरता यांनी कायदा बनवला नाही, लोकांकरता कायदा बनवत आहेत. तू भ्रष्टाचार करत आहेस, ये. आजा मेरी गाडी में बैठ जा, असं झालं आहे. दुसरीकडे असेल की मळ आणि भाजपमध्ये आलं की कमळ. भाजप आता भ्रष्ट जनता पार्टी झाली आहे, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

‘निवडणुका आल्या की यांना जुन्या मित्रांची आठवण होते. हा देश मोदींचा नाही गरिबांचा आहे. निवडणुका आल्या की धार्मिक लढाया लावल्या जातात. विकास तर इंग्रज पण करत होते, पण त्यांची गुलामी आम्हाला नको होती. निवडणुकीच्या वेळी हे तुम्हाला गंडवतात. आता लढाई सुरू झाली आहे, हे तुम्हाला आपापसात लढवतील,’ असं उद्धव ठाकरे म्हणाले.
‘मी मोदींच्या नाही, तानाशाहीच्या विरोधात आहे. भारत मातेला पुन्हा गुलाम होऊ देणार नाही. उठ बोललो की उठ बस बोललो की बस, अशी गुलामी आम्हाला नको आहे,’ असा निशाणा उद्धव ठाकरे यांनी साधला.

या कार्यक्रमातून उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा साधला.
‘मी म्हणजे ठाणे असं काहींना वाटतं, पण नाही. ठाणे म्हणजे असली शिवसेना, कारण मार्केटमध्ये चायनीज मालही येतो. बनावट चायनिज बोगस गद्दारांना वाटतंय ते खरी शिवसेना आहेत. शिवसेनेपेक्षा कुणी वर जाऊ शकत नाही, तुम्हाला वाटत असेल तर इतके वर जाल की परत येऊ शकणार नाही. हा जोश पाहून काहींचा होश उडाला आहे. ज्या सरकारचा जन्मच खोक्यांमधून झाला ते काय न्याय देणार?’ अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
‘हॉलमधील गर्दी पाहून अनेकांना चक्कर येईल. जे प्रश्न विचारतील त्यांना तुम्ही उत्तर भारतीयच उत्तर देतील. कोरोना काळात मला जे करायचं आहे ते मी केलं. राज्यातील जनता मला परिवारातील एक सदस्य मानतात. माझ्या कुटुंबाचं संरक्षण मीच करणार, महाराष्ट्र माझा परिवार आहे,’ असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

‘माझ्या गळ्यात पट्टा बांधणारा जन्माला आला नाही,’ असं प्रत्युत्तरही उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. काहीच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. आम्ही घेतलेल्या निर्णयानंतर अनेक जण घराबाहेर पडले, त्यांच्या गळ्यातील पट्टेही निघाले, असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं होतं.