हिंडेनबर्ग प्रकरणी जीपीसी चौकशीची गरज नाही-शरद पवारांचा यूटर्न!

नवी दिल्ली: हिंडेनबर्ग प्रकरणी काँग्रेसकडून वारंवार मागणी होत असलेल्या जीपीसी चौकशीची गरज नाही असे खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीच म्हटले आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी काँग्रेसवरच घणाघाती टीका करत अदानींना क्लीन चिट दिली आहे.

काँग्रेसवर टीका करताना शरद पवार म्हणाले की, हिंडेनबर्ग अहवालातून अदानी समूहाला टार्गेट केले जात आहे. अदानी समूहाने काही चुकीचे केले असेल तर त्याची चौकशी झालीच पाहिजे. काँग्रेसकडून अदानी प्रकरणाला जास्त महत्व दिले गेले. अदानींबाबत विधाने करणाऱ्यांची पार्श्वभूमी काय? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित  केला.

शरद पवार पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट यांची युती आहे. पण, आम्ही काँग्रेसच्या विचारांशी सहमत नाही. अदानी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने तज्ज्ञांची समिती स्थापन करून चौकशी करण्यास सांगितले आहे. त्यामुळे जेपीसी चौकशीची गरज नाही, असेही ते यावेळी म्हणाले.काँग्रेस खासदार राहुल गांधींसह विरोधी पक्षांचे कान पिळले आहेत. “संसदेत सामान्य नागरिकांच्या प्रश्नांच्या महत्त्वाच्या विषयांकडे दुर्लक्ष करून अदाणी-हिंडेनबर्ग विषयावर चर्चा झाली” असं म्हणत शरद पवारांनी निशाणा साधला. तसेच या राजकीय विषयाला अधिक महत्त्व देण्याची गरज नव्हती, असंही नमूद केलं. 

शरद पवार म्हणाले, “विषय व्यक्तिगत झाले आणि काही महत्त्वाच्या विषयांकडे दुर्लक्षही करण्यात आलं. संसदेत कोणत्या विषयावर जास्त संघर्ष करण्याची आवश्यकता असते, तर देशवासीयांसमोर काय प्रश्न आहेत ते मुद्दे महत्त्वाचे आहेत. बरोजगारी, महागाई, कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती आणि असे अनेक प्रश्न आहेत.”“एखाद दुसऱ्या दिवशी राजकीय विषय येतात. मात्र, जे सामान्य लोकांना त्रास देणारे मुद्दे आहेत त्याकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही. या विषयांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्याचं काम होतं तेव्हा चुकीच्या रस्त्यावर चाललो आहोत हा विचार करता आला पाहिजे,” असे मतही शरद पवार यांनी व्यक्त केलं.