‘लोकशाहीसाठी अतिशय घातक निर्णय, बेबंदशाहीला सुरुवात’ : उद्धव ठाकरे

मुंबई ,१७ फेब्रुवारी /प्रतिनिधी :-केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दिलेला निर्णय हा आपल्या देशाच्या लोकशाहीसाठी अतिशय घातक निर्णय आहे. दुर्देवाने आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरु असताना आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर घोषणा करायला हरकत नाही. ७५ वर्षाचं स्वातंत्र्य संपवून आणि बेबंदशाहीला सुरुवात केलेली आहे, अशी पहिली प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.

image.png

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांनी आगपाखड केली. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता त्यांना चोर अशी उपाधी दिली आहे. निवडणूक आयोगाने  शेण खाल्ले , असे  म्हणत त्यांनी जोरदार हल्लाबोल केला.

निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची घोषणा देखील त्यांनी यावेळी केली आहे. ”आज शुक्रवार आहे. त्यामुळे आता निर्णय घेता येणार नाही. आम्ही नक्की या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाऊ,” असे  उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

आजपर्यंत आपण अनेक उदाहरणे पाहिली आहेत जिथे सरकारची दादागिरी चालली आहे. अगदी न्याययंत्रणासुद्धा आपल्या दबावाखाली कशी येईल याच्याबद्दल केंद्रीय कायदा मंत्री आणि त्यांना न्यायमूर्ती नेमण्याचेही अधिकार हवे आहेत. असंच सुरू राहिलं तर लोकशाहीला भावपूर्ण आदरांजली वाहून आम्ही बेबंदशाहीला सुरुवात करत आहोत असं बोलण्याचं धाडस पंतप्रधानांनी दाखवायला हवे  असे  उद्धव ठाकरे म्हणाले.

आजचा निर्णय हा अनपेक्षित आहे. जवळपास सहा महिने ही लढाई सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. जोपर्यंत हा निकाल लागत नाही तोवर निवडणूक आयोगाने निकाल देऊ नये असं आम्ही म्हणत होतो. पक्ष कुणाचा हे केवळ आणि केवळ निवडून आलेल्या आमदार, खासदारांच्या जोरावर ठरवलं तर कुणीही धनाढ्य माणूस या आमदार, खासदारांना विकत घेऊन पक्षाचा सर्वेसर्वा , मुख्यमंत्री, पंतप्रधान होऊ शकतो अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली.

निवडणूक आयोगाबद्दल इतकंच बोलेन की प्रशांत भूषण यांनी निवडणूक आयोगावरच शंका व्यक्त केली. जसं न्यायाधीश नेमण्याची प्रक्रिया आहे तशीच निवडणूक आयुक्त नेमायला हवेत. आज जी दयनीय अवस्था गद्दारांची झाली आहे त्यांना स्वत: लढण्याची हिंमत नाही. मला शक्यता वाटते की ज्या पद्धतीने धनुष्यबाण आणि शिवसेना शिंदे गटाला दिले याचाच अर्थ महिन्या दोन महिन्यात महापालिकेच्या निवडणुका जाहीर केल्या जातील. त्यांना कोणत्याही परिस्थिती मुंबई महापालिका जिंकायची आहे. मुंबईच्या हातात भिकेचा कटोरा देऊन दिल्लीश्वरांच्या दारात उभी करायची आहे असा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला.

उद्धव ठाकरे काय-काय म्हणाले?

काय बोलायचे हा देशातला मोठा प्रश्न. निवडणुक आयोगाचा निकाल लोकशाहीसाठी घातक. देशाच्या स्वातंत्र्याचा ७५ वर्षात आता सरकारची दादागिरी सुरु आहे. पंतप्रधानांनी आता जाहीर करावे लोकशाही नाही बेबंदशाही सुरु आहे. न्याययंत्रणा आपल्या ताब्यात घेण्याचे प्रयत्न. आजचा निकाल अत्यंत अनपेक्षित. सहा महिने न्यायालयात लढाई सुरु तो पर्यंत निवडणुक आयोगाने निकाल देऊ नये असे बोललो होतो. निवडणुक आयोग बाबत सांगेल जशी न्यायधीश निवडीची प्रक्रिया तशीच निवडणुक आयुक्तांच्या बाबतीत असायला हवी. जगातल्या मोठ्या पक्षाची स्वतः हून लढण्याची हिंमत नाही. निवडणुका घेण्याचे आव्हान मी केले. आता चिन्ह मिंधे गटाला दिल्यावर आता मनपा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता. मुंबईवर ताबा मिळवण्याची भाजपची रणनिती.

शिवसेनाप्रमुखांनी पुजलेला धनुष्यबाण आजही माझ्याकडेच. १०० कौरव एकत्र आले तरी पांडव जिंकले. महाराष्ट्रातील जनता याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. सर्वोच्च न्यायालयात आम्ही जिंकू अशी अपेक्षा. केंद्रीय मंत्री म्हणाले होते द्या ब्रेकींग न्यूज. आज धनुष्यबाण ओरबाडून घेतले तरी तुम्हाला मिळणार नाही. चोरी पचली तरी चोर चोरच असतो. आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार. तोवर त्यांना पेढे खाऊ द्या. शिवसैनिकांनो खचून जाऊ नका. हिंमत सोडू नका, असे चोर चोरी पचवू शकणार नाही. 

आम्ही न्यायालयाला विनंती केली होती की निवडणुक आयोग गडबड करणार. आमचा सर्वोच्च न्यायालयावर आमचा नितांत विश्वास. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी या केसवर जगाचे लक्ष. हे सगळे लोकशाही विरोधी कृत्य परकीय गुतंवणूकदार पण बघताहेत. गेले काही दिवस निवडणुक आयोगाचे थोतांड. आम्ही शपथपत्र, अर्ज लाखोंच्या संख्येने. निवडणुक आयोगाने आज शेण खाल्ले. हिंदुत्वाचा त्याग केला म्हणजे काय केले? भाजपने पाठीत वार केला म्हणून मी काँग्रेस सोबत गेलो. उद्या त्यांनी नमाज पढले तरी ते हिंदू का?

बाळासाहेबांचे विचार गुलामी करण्याचे नाहीत. आम्ही पोटनिवडणुक जिंकलो. महाराष्ट्रात मोदी नाव चालत नाही. आता बाळासाहेब चोरले. तुम्ही पोटनिवडणुक का नाही लढले. लोकशाही सक्षम व्हावी तर सर्वच क्षेत्रांनी एकत्र यायलाच हवे. आज माध्यमांवर पण धाडी पडताहेत. महाराष्ट्रात आज दोन पोटनिवडणुका सुरु आहेत तेव्हाच निवडणुक आयोगाने निकाल दिला. ते म्हणतात काँग्रेसने तेव्हा तसेच केले, पण म्हणूनच लोकांनी तुम्हाला निवडून दिले. देशाचे न्यायालय ही शेवटची आशा. निवडणुक आयुक्तांच्या विरोधात प्रशांत भू़षण यांनी केस दाखल केलीय. पंतप्रधानांनी दखल घेतली असती तर लोकशाही विरोधात कृत्य झाले नसते. शिवसेना आता जोमाने पुढे येणारच. अंधेरी पोटनिवडणुक झाली तेव्हा पण धनुष्यबाण नव्हते पण अगोदरपेक्षा आम्हाला अधिक मते. उद्या कदाचित आम्हाला दिलेली मशाल पण काढून घेतील. ह्याची नोंद ठेवा. आपण लोकशाही संपतांना आपण गुपचूप बसणार आहोत का?  इंदिरा गांधींना पण जनतेने नाकारले होते आणीबाणी लावली म्हणून. यांनी कागदावर धनुष्यबाण चोरलाय. आता भाजप बाळासाहेबांचा चेहरा लावून निवडणुका जिंकायच्या आहे. 

पाच न्यायमूर्ती निकाल देणार असतील तर आमचा आक्षेप नाहीच. ते निष्पक्षपणे सुनावणी घेताहेत. जे शिवसैनिक भेटतात त्यांना मी हेच सांगितले आपण १९६६ सालात आहोत. आपण देण्याचे काम केले. निवडणुकांसाठीच निवडणुक आयोगाने ठरवून निकाल दिला. ज्यांनी गद्दारांना नेता बनवले ते माझ्यासोबतच. निवडणुक प्रक्रिया कशी पार पडली त्याच्या सीडी इत्यादी सगळच निवडणुक आयोगाला दिले. सदस्य संख्या, पदाधिकारी आमच्या बाजूने आम्ही त्यांना भारी पडले. आम्ही निवडणुक आयोगाला घरची रद्दी नाही दिली. ज्या पद्धतीने हलकटपणा सुरु आहे तसे कदाचित ते मशाल पण काढून घेऊ शकतात. आज तुमच्या माध्यमातून तातडीने मी शिवसैनिक आणि जनतेसमोर आलो.