राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा खोचक टोला,नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला

ती लहान माणसं आहेत त्यांच्यावर कशाला बोलू?-शरद पवार

मुंबई ,११ जुलै /प्रतिनिधी :- महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना , काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र असले तरी तिन्ही पक्षांत सर्वकाही आलबेल नसल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस पक्षाकडून स्वबळाचा नारा सुद्धा दिला जात आहे. याच दरम्यान नाना पटोले  यांनी एका कार्यक्रमात थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांवर  आणि शिवसेनेवर  टीका केली. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवारांना नाना पटोले यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, “या गोष्टींमध्ये मी पडत नाही. ती लहान माणसं आहेत त्यांच्यावर मी कशाला बोलू? जर सोनिया गांधी काय बोलल्या असत्या तर मी बोललो असतो.”

शरद पवारांनी यावेळी काँग्रेसकडून देण्यात आलेल्या स्वबळाच्या घोषणेवरही प्रतिक्रिया दिली. “प्रत्येकजण आपला राजकीय पक्ष मोठा करण्याच्या प्रयत्नात असणार. काँग्रेसने भूमिका घेतली असेल तर त्यात काहीही चुकीचं नाही. आम्ही सरकार एकत्र चालवतो, याचा अर्थ आम्ही पक्ष एकत्रित चालवत नाही. आम्ही प्रत्येकजण पक्ष वेगळ्या पद्धतीने चालवतो. प्रत्येकाला आपल्या पक्षाची व्याप्ती वाढावी अशी इच्छा असणार. यात काहीही चुकीचं नाही. त्यामुळे यात गैरसमज असण्याचं काहीही नाही. सरकार एक विचारानं आहे की नाही हे महत्वाचं आहे,” असं शरद पवार म्हणाले आहेत.

विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडे राहील

शरद पवार यांनी यावेळी विधानसभा अध्यक्षपदावरही भाष्य केलं.” आमच्या तीन पक्षांचा निर्णय झाला आहे. विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडे होतं आणि ते काँग्रेसकडेच राहणार आहे. त्यामुळे कोणीही काही बोलायचा संबंधच येत नाही. आम्हा तिन्ही पक्षांना काँग्रेसचा अध्यक्ष मान्य आहे. त्या निर्णयावर आम्ही कायम आहोत,” असं शरद पवारांनी सांगितलं.