‘गर्भसंस्कार @ नवीन पाऊल’ या उपक्रमाची सुरुवात
गर्भसंस्कार रुजविण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा-जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय
औरंगाबाद,५ जानेवारी / प्रतिनिधी :- बाळावर चांगले संस्कार करण्याची सुरुवात ही गर्भावस्थेपासून होते. यासाठी गर्भसंस्कार ही देखील महत्वाची पध्दती आहे. गर्भावस्थेदरम्यान बाळाला चांगल्या गोष्टी शिकविणे व सकारात्मक विचार, नैतिक मूल्य गर्भसंस्कामधून मिळतात. यातून भावी पिढी सुढृद व सर्व गुण संपन्न निर्माण व्हावी म्हणून गर्भसंस्काराचे महत्व रुजविण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सांगितले.
‘गर्भसंस्कार @ नवीन पाऊल’ या उपक्रमाची सुरुवात शुक्रवार 12 जानेवारीपासून करण्यात येणार आहे. यानंतर दर शुक्रवारी आणि शनिवारी गंर्भसंस्कारावर मार्गदर्शन करणा-या तंज्ञाच्या व्याख्यानाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढाकाराने करण्यात येणार आहे. समाज माध्यमातील व्हाट्अप, इन्स्टाग्राम, फेसबुक, टिव्टर व युट्युब चॅनलच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे थेट प्रसारण होणार आहे. आशा, अंगणवाडी सेविका, एएनएम परिचारीका यांच्यामार्फत मोबाईलच्या माध्यमातून हे व्याख्यान गर्भवतींपर्यंत पोहचविण्यात येणार असून या व्याख्यानाचा नागरिकांनी आणि विशेषत: गर्भवतींनी लाभ घेण्याचे आवाहन श्री. पाण्डेय यांनी केले.
या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना, लोहमार्ग पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्यासह आरोग्य, महिला बाल कल्याण, महानगर पालिकेचे आरोग्य अधिकारी जिल्हा शल्य चिकित्सक , जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी, तज्ज्ञ डॉक्टर यांचा समावेश आहे. समन्वयक म्हणून डॉ महेश लढ्ढा आणि डॉ. मेघा जोगदंड काम पाहणार आहेत.
या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विकास मीना, महानगर पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, डॉ. महेश लढ्ढा, डॉ. रेखा भंडारे , जिल्हा महिला बाल विकास अधिकारी प्रसाद एंडोले, डॉ. मंगल ताठे, डॉ. चारुलता रोझेकर, सुमन प्रकल्पाच्या समन्वयक प्रज्ञा सोनवणे, प्रधानमंत्री मातृ योजना रुपाली कुमावत आदी समिती सदस्यांची उपस्थिती होती.