औरंगाबाद औद्योगिक शहर हे जागतिक पातळीवर सर्वात अधिक विकसित अत्याधुनिक औद्योगिक शहरांपैकी एक– केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल

औद्योगिक स्मार्ट शहरांचे आंतरराष्ट्रीय मानकांनुसार नियोजन करण्यात आले आहे: केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री

केंद्रीय वाणिज्य तसेच उद्योगमंत्र्यांनी औरंगाबाद औद्योगिक शहरासारख्या आधुनिक औद्योगिक टाऊनशिपसारख्या ठिकाणी उद्योगांना आमंत्रित केले

चौथी एनआयसीडीसी गुंतवणूकदार गोलमेज परिषद

मुंबई ,​१०​ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- ‘उद्योग वाढीसाठी राज्यात उत्तम पायाभूत सुविधा तयार झाल्या आहेत, आता केंद्र आणि राज्य शासनाने हातात हात घालून काम केल्यास खऱ्या अर्थाने भारताचा कायापालट होऊ शकतो. महाराष्ट्र हे देशातील सर्वात औद्योगिक, प्रगतीशील आणि वेगाने विकसित होणारे राज्य आहे. त्यामुळे सध्याच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पुन्हा एकदा वैभवाचे शिखर गाठेल’, असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला. आज मुंबई येथे चौथी एनआयसीडीसी गुंतवणूकदार गोलमेज परिषद  आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

महाराष्ट्र औद्योगिक टाऊनशिप लिमिटेडने या परिषदेचे आयोजन केले आहे. नामवंत गुंतवणूकदारांव्यतिरिक्त,  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, विविध देशांचे वाणिज्य दूत आणि महाराष्ट्र सरकारमधील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री श्री. गोयल पुढे म्हणाले, ‘पायाभूत सुविधांच्या निर्मीतीचे महत्त्व जगाने ओळखले आहे. यामुळे  उद्योग वाढीसह अर्थव्यवस्थेला चालना तर मिळतेच, त्याचबरोबर अनेक नव्या संधी निर्माण होतात.  राज्यात  मेट्रो, ट्रान्स हार्बर, कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग यासारख्या पायाभूत सुविधांची निर्मिती होत आहे. लॉजिस्टीक्सचा खर्च कमी होण्यासाठी यामुळे मदत होणार आहे’.

तंत्रज्ञानाचा वापर करुन उद्योजकांसाठी देशात अनेक सुविधा निर्माण केल्या गेल्या आहेत. एक खिडकी योजनेच्या माध्यमातून परवानगी देण्याची सेवा ही सध्या प्रायोगिक तत्वावर सुरु आहे. यात काही सुधारणा करण्यासाठी सूचना आमंत्रित असल्याचेही केंद्रीय मंत्री श्री. गोयल यांनी सांगितले.

‘सन 2047 पर्यंत देशाची अर्थव्यवस्था 30 ट्रिलीयन डॉलर एवढी होईल’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘महिला उद्योजक, स्टार्टअप यांचा देशातील वाढत्या उद्योजकतेत महत्वाचा सहभाग आहे. जगाचे ग्रोथ इंजिन म्हणून आपला देश काम करत आहे’, असेही केंद्रीय मंत्री श्री. गोयल म्हणाले.

DCIM103MEDIADJI_0953.JPG

एयुआरआयसी अर्थात औरंगाबाद औद्योगिक शहरासारख्या औद्योगिक स्मार्ट शहरांचे महत्व अधोरेखित करत केंद्रीय वाणिज्यमंत्री म्हणाले, “एयुआरआयसीसारख्या आधुनिक औद्योगिक टाऊनशिपमध्ये व्यवसाय उभारण्यातच खरी व्यावसायिक समज आहे. या औद्योगिक स्मार्ट शहरांचे नियोजन  आंतरराष्ट्रीय मानकांनुसार  करण्यात आले आहे. अशा ठिकाणी व्यवसायासाठी येणारे उद्योग देशाच्या उत्पादन क्षेत्राला अधिक सामर्थ्य प्रदान करतील.”  

एमआयटीएलचा सर्वात महत्त्वाचा औद्योगिक भाग असलेले एयुआरआयसी म्हणजेच औरंगाबाद औद्योगिक शहर हे जागतिक पातळीवर सर्वात अधिक विकसित अत्याधुनिक औद्योगिक शहरांपैकी एक आहे. या भागात 7,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेची गुंतवणूक आणि समर्पित निवासी जागांसह हा भाग मराठवाड्यातील औद्योगिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. एयुआरआयसीने पंतप्रधान एमआयटीआरए योजनेअंतर्गत केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या पाठबळासह उभारण्यात येणारा एमआयटीआरए वस्त्रोद्योग पार्क, नियोजित मेगा फूड पार्क तसेच आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर यांच्या विकासासाठी योजना तयार केली असून या तीनही सुविधांची उभारणी होत असल्यामुळे, हा भाग खऱ्या अर्थाने जागतिक गुंतवणुकीसाठी सुयोग्य भाग ठरणार आहे.

राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास महामंडळ (NICDC) हे एक विशेष उद्देशाचे माध्यम आहे जे नवीन औद्योगिक शहरे “स्मार्ट शहरे’ म्हणून विकसित करून पायाभूत सुविधा क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञान एकत्रित करण्याचे उद्दिष्ट असलेल्या भारतातील सर्वात महत्वाकांक्षी पायाभूत सुविधा कार्यक्रम म्हणजेच राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रमाची निर्मिती, प्रोत्साहन आणि विकास सुलभ करते. या कार्यक्रमाचा उद्देश भारतातील नियोजित शहरीकरणाला चालना देणे आणि उत्पादन क्षेत्र हे त्यातील प्रमुख चालक आहे.

केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणाले की, देशाचा कायापालट करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार एकत्र काम करत आहेत. महाराष्ट्रावर आपला विश्वास असल्याचे सांगून ते म्हणाले, “मला खात्री आहे की सध्याच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पुन्हा एकदा देशातील सर्वात औद्योगिक, प्रगतीशील आणि वेगाने विकसित होणारे राज्य म्हणून स्वत:ला सिद्ध करेल.”

अर्थव्यवस्थेत पायाभूत सुविधा क्षेत्राच्या महत्त्वाचा पुनरुच्चार करताना, पियुष गोयल म्हणाले की अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यात पायाभूत सुविधांनी ऊर्जा आणि अर्थव्यवस्था निर्माण केली आहे आणि नवीन संधी जागृत केल्या आहेत. त्यांनी माहिती दिली “आपल्याकडे जवळपास 111 लाख कोटी रुपयांच्या राष्ट्रीय पायाभूत सुविधा पाइपलाइन आहेत आणि त्यातील मोठा भाग महाराष्ट्रात आहे”. ते पुढे म्हणाले, “मेट्रो प्रकल्प, ट्रान्स-हार्बर लिंक, किनारी रस्ता प्रकल्प, द्रुतगती मार्गाचा विस्तार हे महत्वाचे प्रकल्प आहेत ज्यांचा महाराष्ट्राला मोठा फायदा होईल.”

पियुष गोयल पुढे म्हणाले की, बृहत अर्थव्यवस्थेचे मूलभूत घटक मजबूत आहेत, पायाभूत सुविधांची उभारणी वेगाने होत आहे आणि संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे आहे. “आपण सर्व मिळून भारताला, जगाचे भविष्य बनवू शकतो.”

येत्या सहा-सात वर्षांच्या काळात महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठेल: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुढील 6-7 वर्षात ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याची महाराष्ट्राची महत्वाकांक्षा आहे. गुंतवणूकदारांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आमच्याकडे गुंतवणुकदारांसाठी प्रोत्साहनपर पॅकेज आहे. आम्ही उद्योग क्षेत्राच्या विशेष गरजा देखील पूर्ण करत आहोत.”

पूर्वी औरंगाबाद इंडस्ट्रियल टाऊनशिप लिमिटेड म्हणून ओळखला जाणारा एमआयटीएल, हा भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारचा संयुक्त उपक्रम आहे.

‘केंद्र शासनाच्या सहकार्याने राज्यात उद्योगवाढीसाठी उत्तम पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत. जास्तीत-जास्त गुंतवणुकदारांनी गुंतवणुकीसाठी पुढे यावे’, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

श्री. फडणवीस म्हणाले, ‘उद्योजकांसाठी प्रोत्साहनांचे पॅकेज तयार आहे, उद्योगाच्या विशेष गरजा देखील पूर्ण केल्या जात आहेत. औरंगाबाद येथे ओरिक सिटी  (AURIC) मध्ये एक उत्तम परिसंस्था तयार केली आहे. याठिकाणी ‘प्लग’ आणि ‘प्ले’ यासाख्या सुविधा तयार आहेत. इथे मिळालेली जागा अपुरी पडेल असा प्रतिसाद याठिकाणी मिळतो आहे.

आतापर्यंतचा सर्वात स्मार्ट एक्सप्रेस-वे, नागपूर मुंबई एक्सप्रेस-वे (समृद्धी महामार्ग) तर ओरिक सिटी  (AURIC) ही औद्योगिक वसाहत आहे.  एक्सप्रेसवेसोबत बंदरांच्या जोडणीवर भर दिला जात आहे.  रेल्वेचे जाळे उत्तम आहे. इथल्या विमानतळाचा विस्तार केला जाणार आहे. आम्ही तिथे काय तयार केले आहे ते पहाण्यासाठी प्रत्यक्ष भेट द्या’, असे आमंत्रण देश विदेशातील उद्योजकांना त्यांनी दिले.

गुंतवणुकीत राज्य अव्वल आहे. स्टार्टअप्समध्ये सर्वात जास्त  स्टार्टअप्स  महाराष्ट्रात आहेत.  देशातील १०० युनिकॉर्नपैकी २५ युनिकॉर्न कंपन्या या  महाराष्ट्रातील आहेत. तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांचा वापर करून पुढील काही वर्षातच महाराष्ट्र ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे लक्ष्य पूर्ण करेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री यांनी यावेळी व्यक्त केला.

उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, राज्यात पायाभूत सुविधांचा विकास, इज ऑफ डुईंग बिजनेस आणि उद्योग वाढीसाठी पुरक असे धोरण तयार करणे या त्रीसुत्रीवर उद्योग विभाग काम करित आहे.

राष्ट्रीय औद्योगिक मार्गिका विकास महामंडळाचे (NICDC) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तथा लॉजिस्ट‍िक्स सचिव  अमृत लाल मीणा यांनी देशातील कॉरिडॉर विकासाबद्दल माहिती दिली. उद्योग विभागाचे प्रधन सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी राज्याची औद्योगिक भूमीका मांडली, तर औरंगाबाद ओरिक सिटी चे व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी यांनी आभार प्रदर्शन केले.

यापूर्वी गुंतवणूकदारांची गोलमेज परिषद दिल्ली, कोची आणि अहमदाबाद येथे झाली होती. यंदाची ही चौथी परिषद  भारतातील अनेक शहरांत उदयास येत असलेल्या ग्रीनफिल्ड औद्योगिक शहरांत होत असलेला विकास दर्शवणार असून याची योजना राष्ट्रीय औद्योगिक मार्गिका विकास महामंडळाने  आखली आहे.

सध्याच्या घडीला, महाराष्ट्रात औरंगाबाद, रायगड, सातारा आणि नागपूर या  चार ग्रीनफिल्ड  स्मार्ट औद्योगिक शहरांचा विकास करण्यात येणार आहे.  हित धारकांमध्ये अर्थपूर्ण चर्चा घडवून गुंतवणूकदारांसाठी विविध सहकार्याच्या संधी निश्चित करण्याचा परिषदेचा उद्देश आहे.