आदर्श महिला नागरी सहकारी बँकेवर रिझर्व बँकेने घातले निर्बंध

पैसे काढण्यावरही बंदी

बँकांचे ग्राहक बँकेत जमा केलेले पैसे काढू शकणार नाहीत

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने विविध राज्यांतील ५ सहकारी बँकांवर विविध निर्बंध लावले आहेत. यात महाराष्ट्रातील दोन बँकांचा समावेश आहे. हे निर्बंध ६ महिने कायम राहणार आहेत. या निर्बंधामध्ये पैसे काढण्यावरही बंदी असल्याने आता सदर बँकांचे ग्राहक बँकेत जमा केलेले पैसे काढू शकणार नाहीत. आरबीआयच्या पूर्व परवानगीशिवाय या बँका कोणत्याही नवीन ग्राहकाला कर्ज देऊ शकणार नाहीत.

आरबीआयने म्हटले आहे की, या बँकांच्या कामकाजाचा आढावा घेऊनच ही बंदी हटवण्याचा किंवा वाढवण्याचा निर्णय घेण्यात येईल. आरबीआयला बँकांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाल्याचे दिसले तर बंदी उठवली जाणार आहे. या बँकांचा परवाना रद्द करण्यात आला नाही, असेही आरबीआयने यावेळी स्पष्ट केले आहे.

खालील ५ बँकांवर आरबीआयकडून बंदी

रिझव्‍‌र्ह बँकेने एचसीबीएल को-ऑपरेटिव्ह बँक लखनौ (उत्तर प्रदेश), शिमशा को-ऑपरेटिव्ह बँक नियामिथा, मद्दूर (कर्नाटक), उरावकोंडा को-ऑपरेटिव्ह टाऊन बँक, उरावकोंडा (आंध्र प्रदेश) या इतर राज्यातील बँकांवर तर महाराष्ट्रातील आदर्श महिला नागरी सहकारी बँक मर्यादित, औरंगाबाद आणि शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक, अकलूज या बँकांवर निर्बंध घातले आहेत.

यातील उरावकोंडा को-ऑपरेटिव्ह टाऊन बँक आणि शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँकेचे ग्राहक आता त्यांच्या बँकेमधील ठेवींमधून फक्त ५ हजार रुपये काढू शकतात. उर्वरित बँकांचे ग्राहक त्यांच्या खात्यामधून कोणतीही रक्कम काढू शकणार नाहीत.