साई रिसॉट प्रकरणातील याचिका किरीट सोमय्या यांनी घेतली मागे; चर्चांना उधाण

मुंबई, २८ मे  / प्रतिनिधी :-गेल्या काही वर्षांपासून राज्यात साई रिसॉट प्रकरण चर्चेत आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणातील एक याचिका मागे घेतली आहे. ईडीकडून या प्रकरणाची चौकशी सुरु असताना सोमय्या यांनी याचिका मागे घेतल्याने राजकिय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तसेच वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

शिवसेना (ठाकरे गट) आमदार अनिल परब यांच्याशी संबंधित असलेले साई रिसॉट प्रकरण मागील काही वर्षापासून गाजत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणावरून ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब यांना चांगलेच घेरले होते. या प्रकरणाची ईडीकडून चौकशी देखील सुरु आहे.

असे असताना किरीट सोमय्या यांनी अचानक साई रिसॉट प्रकरणातील याचिका मागे घेतल्याने आश्यर्च व्यक्त केले जात आहे. हायकोर्टात हे प्रकरण प्रलंबित असल्याने सोमय्या यांनी याचिका मागे घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

नेमके काय आहे साई रिसॉट प्रकरण?

राज्याच्या राजाकारणात गेल्या काही दिवसांपासून हे प्रकरण चांगलेच गाजत आहे. समुद्र किनारपट्टी अधिनियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हरित लवादामध्ये याचिका दाखल केली होती. मात्र, आज (28 मे) त्यांनी ही याचिका मागे घेतली आहे. सोयय्या यांनी जरी याचिका मागे घेतली तरी मीडिया रिपोर्टनुसार उच्च न्यायालय तसेच ईडीकडून या प्रकरणावरील कारवाई सुरुच राहणार आहे.

किरीट सोमय्या यांनी जरी ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांना या प्रकरणात घेरण्याचा प्रयत्न केला तरी ईडीच्या आरोप पत्रात अनिल परब यांचे नाव नाही. मात्र, अनिल परब यांचे नाव ईडीच्या आरोपपत्रात नसले तरी या प्रकरणात त्यांच्या नावाचा उल्लेख हा वारंवार करण्यात येत आहे. दापोलीतील साई रिसॉट प्रकरणाचा तपास सुरुच असून जयराम देशपांडे आणि सदानंद कदम यांना याप्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे विनोद दिपोलकर, सुदीर शांताराम परदुले, अनंत कोळी, सुरेश तुपे यांच्या नावाचा देखील ईडीच्या आरोपपत्रात समावेश करण्यात आला आहे.