औरंगाबाद शहराला10 जुलै पासून 4 दिवस आड पाणी दिले जाईल-प्रशासक आस्तिककुमार पांडेय घोषणा

मनपाचे अभियंत्यांचे आश्वासन मिळाल्यावर प्रशासकांची घोषणा

औरंगाबाद ,४ जुलै  /प्रतिनिधी :- आषाढी एकादशीपासून चार दिवसांआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सोमवारी घेतला. या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. 
सोमवारी श्री पाण्डेय यांनी पाणी पुरवठ्याचा आढावा घेण्यासाठी स्मार्ट सिटी च्या कार्यालयात बैठक घेतली.  बैठकीला अतिरिक्त आयुक्त बी.बी. नेमाने, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एम.बी. काझी, पाणी पुरवठा योजनेचे समन्वयक हेमंत कोल्हे, उपसंचालक नगर रचना ए बी देशमुख, पाणी पुरवठा विभागाचे सर्व उपअभियंता, उपायुक्त अपर्णा थेटे, नंदा गायकवाड, मुख्य लेखाधिकारी संतोष वाहुळे , महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता अजय सिंह आदी उपस्थित होते.

या बैठकीत आस्तिक कुमार पांडेय यांनी पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ४१ कलमी कार्यक्रमाचा आढावा घेतला. विविध उपाय योजनेमुळे जायकवाडी वरून येणाऱ्या पाण्यात दहा ते पंधरा एमएलडी ची वाढ झाली आहे तर हर्सूल वरून दहा ते बारा एम एल डी पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. 
चार दिवसांआड पाणी पुरवठा करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे का असे त्यांनी प्रत्येक अभियंत्यांना विचारले. सर्वच अभियंत्यांनी चार दिवसाआड पाणी पुरवठा करण्यासारखी स्थिती असल्याचे सांगितले. त्यानंतर १० जुलैपासून चार दिवसांआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय पांडेय यांनी जाहीर केला. मरीमाता, जिन्सी, झोन क्रमांक सहा आणि पहाडसिंगपुरा हे भाग वगळता शहरातील सर्व भागांना 10 जुलै पासून चार दिवसांआड पाणी पुरवठा केला जाणार आहे. 

बैठकीत पांडेय यांनी ४२ कलमी कार्यक्रमाचा आढावा घेतला. बेकायदा नळ कनेक्शन तोडणे, पाण्याची गळती रोखणे, पाण्याची उपलब्धता वाढवणे या बद्दल करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती त्यांनी घेतली.

३५० नळ कनेक्शन कट

शहरातील मुख्य जलवाहिन्यांवर १३०० अनिधकृत नळ असल्याचे सर्वेक्षणात उघड झाले. त्यातील ३५० नळ कापण्यात आल्याची माहिती वाहूळे यांनी बैठकीत दिली. उद्यापासून मनपाच्या नागरी मित्र पथकाचे सैनिक घेवून नळ खंडीत करण्याचे आदेश देण्यात आले. पुढील आदेशापर्यंत पाणीपुरवठ्याचे कामकाज एम.बी. काझी पाहतील असेही यावेळी प्रशासकांनी सांगितले.
गळत्या थांबवा

उपायुक्त अपर्णा थेटे यांच्या पथकाने गळत्या थांबविण्यासंदर्भात अहवाल सादर केला. त्यानुसार संबधित कनिष्ट अभियंते, उपअभियंते यांना पत्र देण्यात आले. अनेक ठिकाणी कामच झाले नाही. गळत्या थांबल्या नाही तर थेट कारवाईचा इशाराही देण्यात आला. पाणीपुरवठ्याच्या एनर्जी ऑडीटची निविदा काढण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
१०० वॉल्व्हवर अत्याधूनिक यंत्रणा

प्रायोगिक तत्वावर शहरातील १०० वॉल्व्हवर अत्याधूनिक यंत्रणा बसिवण्यात येईल. जेणेकरून वॉल्व्ह किती वाजता सुरू केला. किती वाजता बंद केला याची माहिती स्मार्ट सिटीच्या कंट्रोल रूमला कळणार आहे. स्मार्ट सिटीच्या जल बेल ॲपला १० हजार पेक्षा नागरिकांनी डाउनलोड केले आहे. १० जुलैपासून संपूर्ण शहराच्या पाणीपुरवठ्याची अपडेट जल बेल वर पाहायला मिळेल, असेही बैठकीत सांगण्यात आले.