विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी अजित पवार यांची निवड

सभागृहात एकही कायदा विनाचर्चा होणार नाही, याची खबरदारी घ्यावी लागणार-अजित पवार

मुंबई ,४ जुलै /प्रतिनिधी :-विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदी अजित पवार यांची निवड करण्यात आली या निवडीबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले.

आज महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्ष नेतेपदी निवड झाल्यानंतर अजितदादा पवार यांनी सभागृहात आपले मनोगत व्यक्त केले. लोकशाहीत अध्यक्ष, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ही पदे जशी महत्त्वाची असतात, तसेच विरोधी पक्ष नेतेपद देखील महत्त्वाचे असते, अशी भावना अजितदादांनी व्यक्त केली.

विधिमंडळात आपण नियम आणि आयुधांचा व्यवस्थित वापर केला तर जनतेचे प्रश्न सोडवता येतात. विधिमंडळाची जशी गौरवशाली परंपरा आहे, तशी विरोधी पक्ष नेत्यांची देखील परंपरा आहे. मी माझ्या कार्यकाळात अतिशय चांगले विरोधी पक्ष नेते पाहिले आहेत. मी अनेक वर्षे सत्ताधारी पक्षात काम केले आहे. १९९५ ते १९९९ साली विरोधात काम केले. तेव्हापासून अनेक सरकारे जवळून पाहिली. विरोधी पक्ष नेत्यांची ताकद काय असते, हे अनेक दिग्गजांनी विधिमंडळात दाखवून दिले आहे. जनतेला सरकारच्या प्रतिनिधींकडून न्याय मिळाला नाही तर लोक विरोधी पक्ष नेत्याकडे येतात. सत्तेत नसतानाही विरोधी पक्ष नेता जनतेला कसा न्याय देऊ शकतो, हे माझ्याआधी अनेक विरोधी पक्ष नेत्यांनी दाखवले आहे. सत्तेच्या विरोधात राळ उठवून सरकारला देखील अडचणीत आणणारे विरोधी पक्ष नेते आपण पाहिले आहेत, असे अजितदादा म्हणाले.

सभागृहात एकही कायदा विनाचर्चा होणार नाही, याची खबरदारी घ्यावी लागणार आहे. यापुढे एकही कायदा विनाचर्चा मंजूर होणार नाही, हा शब्द विरोधी पक्षनेता म्हणून मी देतो. या कामात मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री यांचे देखील सहकार्य मला हवे आहे, असे आवाहन अजितदादांनी केले.

या सभागृहाचा विरोधी पक्ष नेता म्हणून जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर चर्चा घडवून आणण्याचे काम आम्ही करु. महाविकास आघाडी सरकार २०१९ साली आल्यानंतर लगेचच कोरोनाचे संकट आले. त्यामुळे अधिवेशने एक-दोन दिवसांची झाली. नागपूर अधिवेशन देखील झालेले नाही. आता यापुढे अधिक दिवस अधिवेशन चालेल याची काळजी सरकारने घ्यावी, असे अजितदादा म्हणाले.विधानसभा अध्यक्ष म्हणून श्री. राहुल नार्वेकर यांनी चर्चेसाठी सर्व सदस्यांना वेळ मिळेल याची काळजी घ्यावी. तसेच जास्तीत जास्त दिवस अधिवेशनाला कसे मिळतील, हे पाहावे, असे आवाहनही त्यांनी केले.या सभागृहाने अनेक क्रांतिकारी कायदे केलेले आहेत. यापुढे असेच कायदे व्हावेत, अशी अपेक्षा आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या कामाचा दर्जा, चर्चेचा स्तर उंचावण्याची जबाबदारी जशी सरकारची आहे, तशी ती विरोधी पक्षाची देखील आहे, हे मानणारा मी कार्यकर्ता आहे. जनतेमध्ये गेल्यावर आपल्याला मान खाली घालावी लागणार नाही, याची काळजी आपण सर्वजण मिळून घेऊ, असेही अजितदादांनी सांगितले.विधिमंडळाच्या कामकाजात न्यायालयाचा हस्तक्षेप येऊ नये यासाठी आपण प्रयत्न केला पाहीजे. आपण कायदेमंडळ आहोत, आपण आपले काम केले पाहीजे. उपमुख्यमंत्री चांगले वकील आहेत, ते याची काळजी नक्की घेतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

चांगल्या कामाबाबत विरोधक सकारात्मक असतील. विरोधाला विरोध आम्ही करणार नाही. महागाई नियंत्रणात राखणे महत्त्वाचे आहे, पण जनतेचे हित कशात आहे हे पाहिले पाहीजे. अलीकडे लोकप्रिय निर्णय घेण्याकडे कल दिसतो. पण आपण सर्वच फुकट दिले तर राज्यासमोर अडचणी निर्माण होतात. ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांना मदत दिली गेली पाहिजे. पण ज्यांच्याकडे आहे, त्यांना फुकट देण्याची गरज नसल्याचे मत अजितदादांनी यावेळी व्यक्त केले.विरोधी पक्ष नेत्याने कमी बोलावे आणि सहकारी आमदारांना अधिक संधी द्यावी, याची काळजी मी माझ्या विरोधी पक्ष नेतेपदाच्या कार्यकाळात घेईन. मी सत्तेत असलो काय किंवा विरोधी पक्षात असलो काय, मी सकाळपासून कार्यरत असतो हे सर्वजण जाणतात. त्याच जबाबदारीने मी विरोधी पक्ष नेतेपदाला न्याय देण्याचा प्रयत्न करेन, अशी हमी अजितदादांनी दिली.

राज्यातील जनतेला न्याय देण्यासाठी अजितदादा काम करतील-राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील

महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीवर यापूर्वी अनेक दिग्गज बसले आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने विरोधी पक्षनेते म्हणून अजितदादा पवार यांनी केलेले काम हे पुढील काळात लक्षात राहील, राज्यातील साडेबारा कोटी जनतेला न्याय देण्यासाठी अजितदादा काम करतील, असा विश्वास आज विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

अजितदादा पवार यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर सभागृहात त्यांच्या अभिनंदनपर प्रस्तावावर ते बोलत होते. अजितदादांचा स्वभाव रोखठोक आणि स्पष्ट असल्याने सभागृहातील चुकीच्या गोष्टी व शासनाकडून राहिलेल्या त्रुटींवर समर्थपणे बोट ठेवण्याचे काम अजितदादा करतील, असे जयंत पाटील म्हणाले.

एखादा निर्णय त्वरित घ्यायचा असताना ३०-३५ वर्षांचा त्यांचा प्रदीर्घ अनुभव उपयोगी पडेल. अजितदादांनी उपमुख्यमंत्री पद भूषविले आहे. तसेच अर्थमंत्री म्हणूनही त्यांनी काम केले आहे. प्रत्येक खात्यातील बारकावे समजण्यात त्यांना यामुळे अधिक सुलभता येणार आहे. त्यामुळे सरकारच्या बाजूने विषय मांडले जात असताना अजितदादा विरोधी पक्षाची बाजू अतिशय समर्थपणे मांडतील, असे जयंत पाटील म्हणाले.

नवीन सरकार राज्यातील जनतेसाठी जे जे चांगले काम करेल त्याला अजितदादांचे सहकार्य नक्कीच लाभेल. त्याप्रमाणेच कणखर विरोधी पक्ष नेता म्हणून विरोधी पक्षांच्यावतीने सरकारकडे मागण्या मांडण्याचे काम आणि सोबत योग्य मार्गदर्शन करण्याचे काम अजितदादा निश्चित करतील असे बोलत जयंत पाटील यांनी पक्षाच्यावतीने अजितदादा पवार यांचे अभिनंदन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.