औरंगाबाद विमानतळावरून पुणे व नागपूरसाठी लवकरच सेवा

राज्यातील विमानसेवांचा कालबद्ध विकास – महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष दीपक कपूर

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या शिष्टमंडळाने  महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांची घेतली भेट

Image

मुंबई,१४ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- राज्यातील विमानतळांच्या समस्या सोडविणे व त्यांचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने निवेदनाद्वारे केलेल्या सूचनांबाबत सकारात्मक विचार करून अंमलबजावणी करण्यात येईल  व राज्यातील विमानसेवांचा कालबद्ध विकास केला जाईल, असे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी सांगितले.लवकरच पुणे -औरंगाबाद -नागपूर या मार्गावर विमानसेवा सुरु करण्याचा मानस या बैठकीत बोलून दाखविला.

महाराष्ट्रातील विविध शहरांतील विमानतळांचा विकास व नवीन सेवा सुरू करण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांच्या अध्यक्षतेखाली वर्ल्ड ट्रेड सेंटर येथील कार्यालयात झालेल्या संयुक्त बैठकीत सहभाग घेतला.

महाराष्ट्रातील विमानतळांच्या विकासासाठी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला.

Image

उपाध्यक्ष दीपक कपूर यांनी विमानतळ विकास प्राधिकरणाच्या विविध विकासकामांची माहिती दिली. त्यात प्रामुख्याने कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणासाठी केलेले प्रयत्न व महाराष्ट्र सरकारने केलेल्या अर्थसहायातून येणाऱ्या तीन ते चार महिन्यात कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासाठी 64 हेक्टर जमिनीचे भूसंपादन पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कोल्हापूर विमानतळासाठी भरीव निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही श्री.कपूर यांनी सांगितले.

अमरावती येथील विमानतळासाठी भारत सरकारकडून ५२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून पहिल्या टप्प्यातल्या ६.५ कोटी रुपये मिळाले आहेत. औरंगाबाद विमानतळावरून नवीन रूट सुरू करणे, जळगाव विमानतळावरून विमान सेवा वाढवून मालवाहतूक सेवा सुरु करणे, नाशिक विमानतळावरील सुविधा वाढवणे अशा विविध मागण्यांचा अभ्यास अहवाल सादर करून झपाट्याने वाढणाऱ्या प्रवासी व माल वाहतुकीकरिता जिल्हास्तरावर विमानतळ विकास प्राधिकरण व महाराष्ट्र चेंबरच्या संयुक्त विद्यमाने प्रशिक्षण केंद्र उभारून युवकांना विमानसेवेशी निगडित रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील, असे श्री.कपूर यांनी सांगितले.

विमानतळ प्राधिकरण हे लवकरच अमरावती आणि रत्नागिरी या जिल्ह्यातील विमानतळाच्या विकासकामाला सुरुवात करणार असून नोव्हेंबर 2022 ला अमरावती विमानतळावरून पहिले उड्डाण करण्याचे उद्धिष्ट असल्याचे श्री.कपूर यांनी सांगितले.

विमानतळांच्या समस्या सोडविणे व विकास करणे यासाठी महाराष्ट्र चेंबरची सिविल एव्हिएशन समिती संपूर्ण सहयोग करेल, असे अध्यक्ष ललित गांधी यांनी प्रास्ताविकात सांगितले. अध्यक्ष श्री.ललित गांधी यांनी प्रामुख्याने कोल्हापूर, उत्तर महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या विभागातील शेतमालाला प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरीय माल वाहतूक विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली. तसेच कोल्हापूर विमानतळाचे विस्तारीकरण गतीने पूर्ण करण्याची मागणी केली.

राज्यातील जिल्ह्यांना शहरासाठी जोडण्यासाठी नवीन हवाई मार्ग व विमानसेवा सुरू करण्याच्या सूचना वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी यांनी केली. चेंबरच्या सिविल एव्हिएशन समितीचे सुनीत कोठारी यांनी या प्रसंगी विमान सेवा पुरवणाऱ्या कंपनांच्या इंधनाचा मूल्यवर्धित करामध्ये कपात करून तो १ टक्के करावा असे सुचविले.

विमानसेवा विस्तारीकरणासाठी सर्व विमान कंपनी व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स बरोबर बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने सुरू केलेल्या शिर्डी व नागपूर मालवाहतूक सेवेला मिळणारा प्रतिसाद व तेथील शेतकऱ्यांना होणारा फायदा याची सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली.

शिष्टमंडळात वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी, उपाध्यक्ष करूनाकर शेट्टी, उपाध्यक्ष सौ शुभांगी तिरोडकर, उपाध्यक्ष रवींद्र माणगवे, उपाध्यक्ष सुधाकर देशमुख, उपाध्यक्ष चंद्रशेखर पुनाळेकर, सुनीत कोठारी, प्रभारी सरकार्यवाह सागर नागरे होते.