वैजापूर – गंगापूर चौफुलीवर विचित्र अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी ; जीवित हानी टळली

वैजापूर ,२ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-  भरधाव आयशर ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या रंगाच्या ट्रकला धडक देऊन रस्त्यावर उभ्या पिकअप गाडीवर उलटल्याने पिकअपचा चुराडा झाला व ट्रकमधील रंगाचे डबे रस्त्यावर सांडले. त्यामुळे मोठे नुकसान झाले. या अपघातात जीवित हानी झाली नसली तरी ट्रकचालक जखमी झाला आहे.

Displaying IMG-20220202-WA0109.jpg

हा अपघात सोमवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास वैजापूर शहरापासुन दोन किमी अंतरावर औरंगाबाद मुंबई रस्त्यावर घडला. दरम्यान या चौफुलीवर अनेक हॉटेल चालकांनी रस्त्यावर अतिक्रमण केल्याने चौफुलीवर अपघातांना निमंत्रण मिळत असल्याचा आरोप नागरिकांनी व वाहनचालकांनी अनेक वेळा केला आहे‌. अपघातानंतर वैजापूर ग्रामीण एक ग्रामपंचायतींच्या सरपंच कविता गायकवाड, ग्रामसेवक रेखा जोशी, माजी सरपंच दौलत गायकवाड यांच्या पथकाने तातडीने तेथील अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. 

औरंगाबाद मुंबई महामार्ग हा वैजापूर शहराचा बाह्यवळण रस्ता असून दोन किमी अंतरावर या मार्गावर चौफुली आहे. या भागात अनेक व्यावसायिकांनी आपले व्यवसाय सुरु केले आहेत. सोमवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास बाबरगाव (ता. गंगापूर) येथील रहिवासी वैजीनाथ सावंत हे पिक अप गाडीने नाशिक येथुन बाबरगावला जातांना चहा पिण्यासाठी थांबले होते. त्यांनी पिक अप गाडी (एमएच २० ईजी ६९७३) हॉटेलसमोर उभी केली‌. त्यावेळी गंगापूर रस्त्याने येणाऱ्या भरधाव आयशर ट्रकने (एमएच १५ एचएच ३५५३) औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या रंगाच्या ट्रकला (एम एच ०४ एफजे ८४१५) जोराची धडक दिली. त्यानंतर हा ट्रक घसरत येऊन पिक अप गाडीवर उलटला. त्यामुळे पिक अप गाडी दबून गाडीचे मोठे नुकसान झाले. तसेच ट्रकचालक राजू शहा हा जखमी झाला. ट्रकमधील रंगाच्या टाक्या अस्ताव्यस्त झाल्याने रस्त्यावर लाल सडा पडल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वैजापूर पोलिस ठाण्याचे एपीआय सुदाम भागवत यांनी सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी भेट दिली. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला. याप्रकरणी वैजीनाथ सावंत यांनी फिर्याद दिल्यानंतर ट्रकचालकाविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल विजय खोकड करीत आहेत. 

————————

” रस्त्यावरील अतिक्रमणामुळे गंगापूर चौफुलीवर अपघातांना निमंत्रण मिळत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत. त्यामुळे चौफुलीच्या चारही रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात येणार आहे ”   

 —  दौलत गायकवाड, (माजी सरपंच, वैजापूर ग्रामीण एक)

————————–