पुतळे उभारताना महापुरुषांच्या विचारांचे पालन करणेही गरजेचे – आ.रमेश पाटील बोरणारे
वैजापुरात डॉ. आंबेडकरांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
वैजापूर,१ जानेवारी /प्रतिनिधी :- भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित घटकांना न्याय देण्यासाठी जीवन वेचले. राज्यघटनेची निर्मिती केली. त्यांचे कार्य प्रत्येक भारतीयासाठी आहे. त्यामुळे अशा महापुरुषांना जातीच्या बंधनात अडकवु नका. त्यांचे विचार आचरणात आणल्यास खऱ्या अर्थाने पुतळा उभारण्याचे कार्य सार्थकी लागेल असे विचार प्रमुख वक्त्यांनी व्यक्त केले.
वैजापूर शहरात नगरपालिकेतर्फे दहा लाख पंधरा हजार हजार रुपये खर्चुन पंचधातुचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे अनावरण शनिवारी नगराध्यक्षा शिल्पा परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार रमेश पाटील बोरनारे हे होते. पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी पुतळा परिसरात नागरिक एकत्र आले होते. यानंतर ठक्कर बाजार परिसरात झालेल्या जाहीर सभेला कॉंग्रेसचे जेष्ठ नेते भाऊसाहेब ठोंबरे, उपनगराध्यक्ष साबेर खान, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, भाजपाच्या राज्य कार्यकारिणी सदस्य एकनाथराव जाधव, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती, अकिल शेख, डॉ. व्ही.जी. शिंदे, माजी उपनगराध्यक्ष मजीद कुरेशी, सेवानिवृत्त न्यायधीश एस.एस. साळवे, पुतळा समिती सदस्य सी.बी थोरात, गोपीनाथ थोरात, विठ्ठल साळवे, खुशालसिंह राजपूत या मान्यवरांची उपस्थिती होती.
सेवानिवृत्त न्यायाधीश साळवे यांच्या पुढाकारातुन १९७९ मध्ये वैजापूर शहरात डॉ.आंबेडकरांचा पुतळा उभारण्यात आला होता. मात्र हा पुतळा जीर्ण झाल्याने वैजापूरच्या नगराध्यक्षा शिल्पा परदेशी, माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, उपनगराध्यक्ष साबेर खान, मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी सर्वांना सोबत घेऊन नविन पंचधातुचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची आखणी केली.
महापुरुषांना जातीच्या बंधनात अडकवण्याची आजकाल फॅशन झाली आहे. प्रत्यक्षात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांंनी वंचित घटकांना न्याय देण्यासाठी कार्य केले. त्यामुळे त्यांना विशिष्ट जातीधर्माच्या चौकटीत अडकवु नका असे आवाहन जेष्ठ नेते भाऊसाहेब ठोंबरे यांनी केले.
माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनीही डॉ.बाबासाहेबांबद्दल विस्तृत विचार मांडले. पुतळे उभारताना महापुरुषांच्या विचारांचे पालन करणेही गरजेचे आहे असे मत आमदार रमेश पाटील बोरनारे यांनी व्यक्त केले.
वैजापूर शहराजवळच्या नारंगी धरणात हैदराबादच्या धर्तीवर तथागत भगवान गौतम बुद्धांचा भव्य पुतळा उभारावा अशी सुचना माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती यांनी केली. या कार्यासाठी वैजापूर मर्चंट बॅक सर्वतोपरी सहकार्य करेल असे आश्वासन त्यांंनी दिले.
कार्यक्रमास शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, तालुकाप्रमुख सचिन वाणी, शहरप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, मर्चंट बँकेचे अध्यक्ष विशाल संचेती, जिल्हापरिषद सदस्य पंकज ठोंबरे, उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास प्रजापती, मुख्याधिकारी बी.यु.बिघोत, प्रभारी तहसीलदार मनोहर वाणी, नायब तहसीलदार महेंद्र गिरगे, पोलीस निरीक्षक साम्राटसिंग राजपूत, सामाजिक कार्यकर्ते धोंडिरामसिंह राजपूत, प्रवीण साखरे, डॉ.संतोष गंगवाल, संजय बत्तीसे, नगरसेवक प्रकाश चव्हाण, दिनेश राजपूत, दशरथ बनकर, डॉ. निलेश भाटिया, वसंत त्रिभुवन, पत्रकार प्रशांत त्रिभुवन, राहुल त्रिभुवन, सुनील त्रिभुवन यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.मोठ्या जल्लोषात व भव्यदिव्य स्वरूपात झालेल्या या कार्यक्रमास तालुक्यातून मोठा जनसमुदाय जमला होता.