रोटरी इंडिया लिटरसी मिशनसाठी सायकलवर २५ हजार किलोमीटरचा प्रवास
आजपर्यंत केला २० राज्यातून प्रवास
औरंगाबाद,२९ डिसेंबर /प्रतिनिधी:- धनुष आणि हेमंत हे रोटरॅक्ट क्लब शिशु मंदिर,बंगळुरूचे सदस्य आहेत. हा क्लब रोटरी क्लब व्हाइटफिल्डने प्रायोजित केला आहेकल्पकता, दृष्टी, आत्मशक्ती, जिद्द, आत्मविश्वास, चिकाटी, समर्पण, शिस्त, कृतीशीलता, अंमलबजावणी, नम्रपणा, कृतज्ञता, आणि विलक्षण शारीरिक क्षमता या सर्व गुणांनी संपन्न या दोन युवकांचे आगमन झाले.
हे दोघे सायकल वर एकाच देशात २५००० किलोमीटर प्रवास करण्याचे गिनीज बुक रेकॉर्ड करण्यासाठी ११ जुलै २०२१ पासुन घराबाहेर पडले आहेत. आतापर्यंतचे रेकॉर्ड १९४०० किलोमीटर हे सुद्धा बंगळुरूच्याच दोन युवकांच्या नावावर आहे ही माहिती धनुष आणि हेमंतने दिली.
जागतिक तापमान वाढ व रोटरी इंडिया लिटरसी मिशन या दोन विषयांचा प्रचार प्रसार आपल्या प्रवासात हे दोघे करत आहेत. सध्याचे रोटरी इंटरनॅशनल चे अध्यक्ष शेखर मेहता (कोलकाता) त्यांच्या संपर्कात आहेत.
मागील दिडशे दिवसात ४ केंद्र शासित प्रदेश आणि २० राज्य मुलांनी पादाक्रांत केली आहेत आणि १६००० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे. पुढील ५० ते ६० दिवसात त्यांना ९००० किलोमीटर प्रवास करायचा आहे.
त्यांच्या प्रवासात जागोजागीचे रोटरी क्लब त्यांना सहकार्य करत आहेत. रोटरी क्लब त्यांच्या रात्री निवासाची आणि भोजनाची व्यवस्था करतात. दररोज १०० ते १२० किलोमीटरचा प्रवास दोघे पूर्ण करतात. महाराष्ट्र हे २० वे राज्य आहे. गुजरात सुरत (१९ डिसेंबर), दमण (२० डिसेंबर), नाशिक (२१ डिसेंबर), शिर्डी (२२ डिसेंबर) असा प्रवास करत दिनांक २३ डिसेंबर रोजी त्यांनी औरंगाबाद मधे प्रवेश केला.
औरंगाबाद मधील आठ रोटरी क्लब च्या वतीने कॉप्स (कौन्सिल ऑफ पास्ट प्रेसिडेंटस) यांनी युवकांच्या स्वागताची व निवासाची व्यवस्था केली होती.
साजापूर चौफुली येथे रोटरी सदस्यांनी मुलांचे स्वागत केले व शहरातील विविध भागातून प्रवास करत त्यांना उल्कानगरी चौकातील रोटरीचे संस्थापक पॉल हॅरीस यांच्या पुतळ्याजवळ आणण्यात आले. तेथे श्रद्धांजली वाहून मुले आयसा हॉल मधे आली व उपस्थित रोटरी सदस्य, सायकल संघटनांचे पदाधिकारी व प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला.
भारत हा किती भव्य आणि दिव्य देश आहे ह्याची प्रचिती ह्या प्रवासात आली. देशवासी किती एकरुप आहेत ह्याचा सुद्धा अनुभव आला. जागोजागी ‘भारत माता की जय’ याचा जयघोष केला जातो तेव्हा मन प्रफुल्लित होते असे दोघे म्हणाले. प्रवासातले अनेक अनुभवही त्यांनी सांगितले. रोटरी संस्थेची व्याप्ती, सदस्यांची तळमळ, आपुलकी, प्रेम आणि आतिथ्य याची प्रचिती अद्वितीय असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
कार्यक्रमास रोटरी क्लब अध्यक्ष राजेश शर्मा (पूर्व), तेजस कुलकर्णी (पश्चिम), ज्योती काथार (मिडटाऊन), माजी प्रांतपाल सुहास वैद्य, माजी अध्यक्ष सुरज डुमणे, अशोक तोष्णीवाल, भारत चोपडे, विश्वनाथ बोराडे, प्रदीप पटेल, गिरीश क्षीरसागर, हेमंत लांडगे, रोटरी सदस्य क्षितीज चौधरी, अक्षय चौधरी, डीआरआर मधुर अग्रवाल, रोटरीचे माजी अध्यक्ष व औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विजय जयस्वाल, आयसा अध्यक्ष मंगल पटेल, औरंगाबाद रँडोनिअर्सचे संयोजक नितीन घोरपडे, औरंगाबाद सायकलींग फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. विजय व्यवहारे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थितांनी मुलांचा सत्कार आणि कौतुक केले तसेच उर्वरित प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
२४ डिसेंबर रोजी सकाळी ६:३० वाजता उल्का नगरी चौकातुन युवकांनी अजिंठ्याला प्रस्थान केले. ह्यावेळी ज्योती तोष्णीवाल यांनी पारंपरिक पध्दतीने औक्षण करून मुलांना निरोप दिला तसेच औरंगाबाद सायकलिंग फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. विजय व्यवहारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी २० किलोमीटर पर्यंत मुलांसोबत सायकलींग करून त्यांना निरोप दिला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हेमंत लांडगे, अशोक तोष्णीवाल, सुरज डुमणे आणि क्षितिज चौधरी यांनी विशेष परीश्रम घेतले.