राज्यात अवकाळी पावसाचं थैमान, गारपीट, पावसानं बळीराजा पुन्हा संकटात
वैजापूर तालुक्यात गंगथडी भागातील अनेक गावांमध्ये गारांचा जोरदार पाऊस
औरंगाबाद,२८ डिसेंबर /प्रतिनिधी:-राज्याला पुन्हा गारपिटीनं तडाखा दिला आहे. औरंगाबादचया वैजापूर तालुक्यतील अनेक गावांना मुसळधार पावसाने आणि गारपिटीने तडाखा बसला आहे. वैजापूरच्या देवगाव ,शनि चेंडूफळ, बाजाठाण , गाढेपिंपळगाव, मांजरी फाटा , आणि गंगापुर मध्ये गारपीट आणि पाऊस झाला. तर कन्नड आणि पैठणमध्ये ही तुफान पाऊस झाला.
विदर्भातही अवकाळी पावसानं थैमान घातलंय. अमरावतीच्या चांदुर बाजार तालुक्याला सकाळीच पाऊस आणि गारपीटीनं झोडपून काढलं. वणी बेलखेडा आणि घाटलाडकी परिसरात तुफान गारपीट झाली. या गारपिटीने संत्र्याचा आंबिया बहार हातातून जाण्याची शक्यता आहे.आज दुपारी सव्वा दोनच्या सुमारास अकोल्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि गारपीट झाली आहे. वेगवान वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे नागरिकांची पुरती तारांबळ उडाली आहे. अवकाळी पावसाने अचानक एन्ट्री मारल्याने शहरातील बाजारपेठांध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे.
तूर, हरभरा, कांदापिकालाही गारपीटीचा फटका बसण्याची शक्यता आहे. नागपूर जिल्ह्यात गारपीट झाली. नरखेड तालुक्यातील वाढोना आणि मेंढला परिसरात गारपीट झाल्यानं शेतकरी चिंतेत आहे. उशिरा लागवड केलेल्या फुलोरा अवसतेत असलेल्या तूर आणि हरभरा पिकांसाठी हा पाऊस नुकसानदायी आहे. आणखी दोन दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांचे ऊस,कांदा व गहू पिकांचे नुकसान
वैजापूर,२८ डिसेंबर /प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यातील गंगथडी भागात आज दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास गारांचा जोरदार पाऊस झाला.सुमारे अर्धातास झालेल्या जोरदार गारपिटीमुळे शेतकऱ्यांनाचे अतोनात नुकसान झाले. शेतात उभी असलेली ऊस, कांदा व गहू आदी पिके भुईसपाट झाली.
तालुक्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास गंगथडी भागात गारांचा जोरदार पाऊस झाला.या भागातील नागमठाण, चेंडूफळ, बाजाठाण, शनी देवगांव आदी गावांमध्ये सुमारे अर्धातास गारांचा जोरदार पाऊस झाला.
ठिकठिकाणी गारांचा थर दिसत होता. या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. ऊस, कांदा व गहू रोपे भुईसपाट झाली. खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता.
खरीप पिकांची नुकसान भरपाई रब्बी हंगामात होईल या आशेने शेतकरी रब्बी पिकांची पेरणी आटोपून पिकांच्या मशागतीच्या कामात व्यस्त असतांना आज दुपारी अवकाळी व गारांचा जोरदार पाऊस सुरू झाला. सुमारे अर्धा तास झालेल्या जोरदार गारपीट व पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशेवर विरजण पडले.