इलेक्ट्रीकल वाहन निर्मिती करणाऱ्या उद्योगांनी ऑरिक सिटीमध्ये गुंतवणूक करावी – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद,१९ऑक्टोबर /प्रतिनिधी :- औरंगाबाद परिसरात उद्योगाला पुरक  पायाभुत सुविधा उपलब्ध असल्याने येथे अनेक उद्योग भरभराटीला आलेले आहेत. सध्या बाजारात इलेक्ट्रीकल वाहनांना मोठी मागणी असल्याने  ऑरीक सिटी मध्ये इलेक्ट्रीकल वाहन निर्मिती करणाऱ्या उद्योगांनी गुंतवणुक करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले.

Displaying 1.jpg

 हॉटेल ताज येथे तैवान मधील तयत्रा या संस्थेच्या पुढाकारातुन आयोजित एका सेमिनारमध्ये जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी  तयात्राचे  संचालक वेलबर्ग वँग, इलेक्ट्रीक वाहन निर्मिती कंपनी अहमनीच्या सचिव श्रीमती ची, तयत्राच्या पदाधिकारी हरजीत गुलाटी, यांच्यासह औरंगाबाद बिझनेस डेव्हलपमेंट क्लस्टरचे पदाधिकारी रमण अजगावकर, रविंद्र कोंडेकर, श्रीधर वेलंगी, श्रीकांत जोशी यांसह उद्योजकांची उपस्थिती होती.

          जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, उद्योग वाढीसाठी औरंगाबाद जिल्ह्यात पोषक वातावरण आहे. ऑरिक सिटीमध्ये जगातील अनेक देशांनी गुंतवणूक करुन औरंगाबादला पसंती दिली आहे. तैवान मधील कमर्शियल इलेक्ट्रीकल वाहन निर्मिती करणाऱ्या ‘फॉरमोसो’ आणि दुचाकी  निर्मिती करणा-या ‘अहमनी’ या उद्योगांनी औरंगाबादेतील ऑरिक सिटीत गुंतवणुकीसाठी पुढाकार घ्यावा. हा उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक असे प्रशिक्षित मनुष्यबळ आणि इतर सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल. औरंगाबाद शहर हवाई, रेल्वे तसेच रस्ते मार्गानी देखील प्रमुख शहरांशी जोडलेले असल्याने उद्योगांना चांगल्या दर्जाची कनेक्टीव्हीटी मिळणार आहे. शिवाय जिल्ह्यात ऑटोमोबाईल उद्योगांला मोठी मागणी असल्याने तैवानमधील फॉरमोसो आणि अहमनी या उद्योगांना औरंगाबादेत गुंतवणुकीसाठी संधी असल्याचेही श्री. चव्हाण यावेळी म्हणाले.