साहित्य हे समाजाची वैचारिक बैठक घडवण्याचं व दिशा देण्याचे कार्य करते — सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण
औरंगाबाद, २५ सप्टेंबर /प्रतिनिधी :-साहित्य हे समाजाच्या विकासासाठी साह्यभूत असून समाजाची वैचारिक बैठक घडवण्याचं व दिशा देण्याचे कार्य साहित्य संमेलनाच्या माध्यमातून होत असते. काव्य, नाटक, कथा, कादंबरी या घटकाच्या माध्यमातून समाजाला वैचारिक मेजवाणी मिळत असते. या घटकांना साह्य आणि मदत करण्याचे काम शासन करीत आहे. यातूनच मराठवाडा साहित्य परिषदेचे नांदेड येथील कार्यालय सुरु करण्याची ग्वाही यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.सहा महिन्यांत नांदेडमध्ये मसापच्या कार्यालयाला जागा देऊ. तसेच अन्य प्रश्नांसाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेऊ. कृती आराखडा बनवू. त्याच्या अंमलबजावणीसाठी दर सहा महिन्यांनी बैठक घेत राहू, असा शब्द अशोक चव्हाण यांनी यावेळी दिला.
यशवंतराव चव्हाण साहित्यनगरीतील संमेलनाच्या व्यासपीठांना संत जनाबाई व्यासपीठ आणि प्र. ई. सोनकांबळे यांची नावे देण्यात आली आहेत. यातील मुख्य संत जनाबाई व्यासपीठावर उद्घाटन सोहळा पार पडला. मावळते संमेलनाध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी 41व्या संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ कादंबरीकार बाबू बिरादार यांच्याकडे सूत्रे सोपवली.
मराठावाडा साहित्य परिषद आणि लोकसंवाद फाऊंडेशन आयोजित 41 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.यावेळी मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बाबु बिरादार, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, आमदार सतिश चव्हाण, मधुकर अण्णा मुळे, के. एस. अतकरे, मावळते संमेलन अध्यक्ष ऋषीकेश कांबळे, साहित्यिक दादा गोरे यांच्यासह मान्यवर साहित्यिक उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले की, लोकांच्या मनातील संवाद व्यक्त व्हायला पाहिजे, बदलत्या माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाचन संस्कृती वाढवण्यासाठी कसा करता येइल याबाबतही चिंतन होणे गरजेचे आहे. वाचनातून वैचारिक बैठक तयार होवून समाजाला दिशा दर्शक भावी पिढी घडवण्याचं काम साहित्य करित असते विचार व्यक्त करण्याची मोकळीक साहित्य लेखणातून मिळते म्हणून साहित्याचा उल्लेख सामाजाचे प्रतिबिंब म्हणून केला जातो, असे मत मंत्री अशोक चव्हाण यांनी कार्यक्रमाच्या उद्घाटनपर भाषणात व्यक्त केले.
मसापला नांदेडात कार्यालय द्यावे
या संमेलनाच्या प्रास्ताविकात कौतिकराव ठाले पाटील यांनी मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्य आणि मागण्या, संमेलन आयोजनामागची भूमिका व्यक्त केली. तसेच नांदेड येथे मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यालयाची सुरुवात करण्याबाबत मागणी मांडली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संमेलनाला परवानगी मिळेल की नाही, इथपासून अनेक प्रश्न मनात होते. पण अनेक अडचणींवर मात करत हे संमेलन आज होत आहे, याचा आनंद आहे, अशी भावना मसापचे अध्यक्ष प्रा. ठाले पाटील यांनी व्यक्त केली. ‘मसाप’ ही संस्था नांदेड शहरात जन्माला आली. नंतर पुढे तिचा विस्तार झाला, पण नांदेडमध्ये संस्थेला हक्काचे कार्यालय नाही. याविषयी पाच वर्षांपूर्वी अशोकरावांनी आश्वासन दिले होते. ते अजूून पूर्ण झालेले नाही. अशोकरावांनी मनावर घ्यावे आणि संस्थेला नांदेडात हक्काची जागा मिळवून द्यावी, असे ठाले पाटील म्हणाले.
मावळते अध्यक्ष ऋषीकेश कांबळे यांनी साहित्यात मराठवाड्याचे योगदान, साहित्य चळवळ आणि साहित्यातील बदलते स्वरुप याविषयी मत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात बाबु बिरादार यांनी आपली साहित्यिक जडणघडण व जीवनानुभव व्यक्त करणाऱ्या साहित्याची निर्मिती त्या विषयी सांगितले. तसेच मराठवाड्याची संत परंपरा, निसर्ग, अनुभव व संस्कार यामुळे मराठवाड्यातील साहित्यिक जमिनीवर राहून लिखाण करीत आहे, असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भगवान देशमुख यांच्या ‘संत महंताची भूमी माझ्या मराठवाड्याची’ या गीताने झाली यांनतर संमेलन उद्घाटन कार्यक्रमात शेवटी ‘गोंदन’ या मराठवाडा साहित्य परिषदेचे स्मरणिकेचे प्रकाशन तसेच बाबू बिरादार यांच्या ‘अधिवास’ या कादंबरीचे प्रकाशन मंत्री अशोक चव्हाण यांनी मान्यावर साहित्यिक यांच्या उपस्थितीत केले.
श्याम देशपांडे ग्रंथनगरी
अवघ हयात ग्रंथ चळवळीत घालवलेल्या आणि नुकतेच निधन पावलेल्या श्याम देशपांडे यांचे नाव संमेलनाच्या ग्रंथनगरीला देण्यात आले आहे. मावळते अध्यक्ष डॉ. ऋषिकेश कांबळे यांच्या हस्ते सकाळी फीत कापून या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या ठिकाणी मराठवाडाभरातून विविध प्रकाशक आणि पुस्तक विक्रेत्यांनी स्टॉल लावले आहेत. सकाळपासूनच या ठिकाणी वाचकांनी पुस्तक खरेदीसाठी गर्दी केली होती.
मसापच्या कार्यकारिणीची बैठक
उद्घाटन सोहळ्यानंतर ना. गो. नांदापूरकर सभागृहात मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीची बैठक प्रा. कौतिकराव ठाले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी गेल्या वर्षभरात निधन झालेल्या देशभरातील महत्त्वाच्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली. यात मराठवाड्यातील सि. ना. आलुरे गुरुजी, त्र्यंबक महाजन, श्याम देशपांडे, सीमा मोघे, माजी आमदार संतोष दसपुते, श. मा. पाटील, सुलोचना महानोर, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या हौसाबाई पाटील यांच्यासह राज्य आणि देशपातळीवरील अनेक नेते, कार्यकर्ते, साहित्यिक आणि विचारवंतांना अभिवादन करण्यात आले.