मराठा आंदोलन ३ मार्चपर्यंत स्थगित:करोडो मराठ्यांनी सरकारच्या वेबसाईटवर ई-मेल करण्याचं जरांगेंचं आवाहन

मनोज जरांगेंनी स्पष्ट केली आंदोलनाची पुढची दिशा

छत्रपती संभाजीनगर,२८ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- मराठा समाजाला राज्य सरकारने १० टक्के आरक्षण दिल्यानंतरही मनोज जरांगे पाटील असमाधानी आहेत. ते सातत्याने मागण्या बदलत असल्याचा आरोप काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. मनोज जरांगे आता ओबीसीमधून आरक्षणाची मागणी करत आहेत. त्यासाठी ते अत्यंत आक्रमक झाले व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पातळी सोडून आरोप केले. यावर सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांतील नेत्यांनी तीव्र नाराजी दर्शवली. यानंतर आता मनोज जरांगे यांनी आपल्या पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट केली आहे. मराठा आंदोलन ३ मार्चपर्यंत स्थगित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

मनोज जरांगे यांच्यावर सध्या छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काल अंतरवाली सराटी येथील आंदोलनाचा मंडप पोलीस हटवत असल्याचे त्यांना समजले आणि ते उपचार सोडून जालन्यामध्ये यायला निघाले होते. मात्र, पोलिसांनी त्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पुन्हा उपचार घ्यायला सुरुवात केली.

यानंतर आज आंदोलनाबद्दल सांगताना ते म्हणाले, विद्यार्थ्यांच्या परीक्षा असल्याने मराठा आंदोलन ३ मार्चपर्यंत स्थगित करण्यात येत असून, तोपर्यंत फक्त धरणे आंदोलन केले जाणार आहे. पुढील आठ दिवस मराठा समाजाने शांत राहावे आणि सरकार काय करत आहेत हे पाहावे. तसेच, महाराष्ट्रातील मराठा समाजाला सांगतो आपल्यात चलबिचल नको, आपली ओबीसीमधून आरक्षणाची मागणी आहे, असेही मनोज जरांगे म्हणाले आहेत.

पुढे जरांगे म्हणाले की, “दडपशाही सुरू आहे, आंतरवाली सराटी येथील मंडप काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे पोलिसांना विनंती आहे की, ते मंडप काढू नयेत आणि गावकऱ्यांवरील दडपशाही बंद करण्यात यावी. आजपासून दडपशाही रोखण्यासाठी करोडो मराठ्यांनी राष्ट्रपती, राज्यपाल यांना ई मेल करावे. सरकारच्या वेबसाईटवर ईमेल करावे, असे आवाहन देखील जरांगे यांनी केले आहे.

ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीवर ठाम

मनोज जरांगे म्हणाले की, “मी १० टक्के आरक्षण स्वीकारणार नाही, अटक करून जेलमध्ये टाकले तरी मी हटणार नाही. मी जेलमध्ये देखील आमरण उपोषण करेन. ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जातीय द्वेष सुरू आहे. मी बोललो देवेंद्र फडणवीस यांना, मात्र याचा राग मराठ्यांच्या नेत्यांना आला. मराठा नेत्यांना जात की नेता हवा आहे, असा प्रश्न जरांगे यांनी उपस्थित केला. जातीने मतदान केले म्हणून तुम्हाला नेत्यांनी जवळ केले. तुमच्या स्वार्थासाठी मराठ्यांचं नुकसान करू नका. यांनी मला अटक केली तरीही मराठा समाजाने शांततेत आंदोलन करावे, असेही जरांगे म्हणाले.