शरद पवारांचा फोटो वापरणार नाही-राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनिल तटकरे

बीड ​येथे  आज  उत्तरदायित्व सभा;सभेनंतर राज्यव्यापी दौरा करणार – सुनिल तटकरे

तरुणांचे, बेरोजगारांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध 

छत्रपती संभाजीनगर,२६ ऑगस्ट /प्रतिनिधी :- अजित पवार आणि त्यांच्या सोबतच्या नेत्यांनी आपला फोटो वापरु नये, त्यांनी फोटो वापरला तर कोर्टात जाऊ, असा इशारा शरद पवार यांनी दिला होता. याबद्दल पत्रकारांनी सुनील तटकरे यांना विचारले असता ते म्हणाले, शरद पवार यांना कायदेशीर कारवाई करण्याची वेळ येणार नाही, अशा प्रकारे वागायचे असे आम्ही ठरवले आहे. म्हणजेच आता आम्ही शरद पवारांचा फोटो वापरणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

राष्ट्रवादी काँग्रेसची जाहीर सभा बीड येथे २७ ऑगस्टला होत असून त्याच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनिल तटकरे यांनी छत्रपती संभाजी नगर येथे आज पत्रकार परिषद घेतली.या पत्रकार परिषदेला आमदार सतीश चव्हाण, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, शहराध्यक्ष अभिजित देशमुख उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आलेल्या याचिकेत आम्ही तसा स्पष्ट उल्लेख केला आहे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

बीडमधील प्रभू वैजनाथाच्या चरणी नतमस्तक होऊन राज्यातील जनतेसमोर संवाद साधण्यासाठी बीड येथे जाहीर सभेचे आयोजन केले आहे. ही उत्तरदायित्वाची सभा आहे. लोकांचे आम्ही उत्तरदायित्व मानत आलो आहे त्यामुळे आम्ही घेतलेली भूमिका व करायचे काम आणि ध्येयधोरणे याची स्पष्टता व्हावी. राज्यभर जे काही दौरे पुढच्या कालावधीत करणार आहोत त्या दौऱ्याची सुरुवात रविवारच्या बीडच्या सभेने होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

२ जुलैला अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्व नेत्यांनी एकत्रित बसून सामुदायिक निर्णयातून एनडीएमध्ये आणि राज्यातील महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यात आमच्या नेत्यांचा मंत्रीमंडळात समावेश झाला. ५ जुलैला एमएटीच्या मेळाव्यात आम्ही घेतलेल्या भूमिकेची पार्श्वभूमी राज्याला अजितदादा पवार यांनी सांगितली. आमची धर्मनिरपेक्षता ही मूळविचारधारा आहे. शाहू, फुले, आंबेडकरांची आहे. त्या विचारांवर ठाम विश्वास ठेवत आणि ती विचारधारा पुढे नेत महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संघराज्य व्यवस्थेमध्ये केंद्र व राज्याची भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्राला अधिक गतीमान पध्दतीने विकासाच्या मार्गावर न्यायचे असेल तर देशामध्ये नरेंद्र मोदी नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार आणि राज्यातील महायुतीत जाण्याचा निर्णय घेतला. त्यातून पक्षाची वाटचाल सुरू असल्याचे दिसत आहे. हा निर्णय घेत असताना घटनात्मक कायदेशीर सर्व बाबींची पूर्तता करत हा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट करतानाच जवळपास दीड महिन्याच्या कालावधीत घेतलेल्या निर्णयाची सरकारच्या माध्यमातून अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील आमचे सर्व मंत्री भूमिका बजावत असल्याचे सुनिल तटकरे यांनी सांगितले. 

राज्यातील जनतेसमोर पक्ष म्हणून अजित दादांच्या नेतृत्वाखाली मंत्र्यांवर वेगवेगळ्या जिल्हयाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांचा जनता दरबारसुध्दा सुरू करण्यात आला आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले. 

पक्षाची संघटना बांधणी सुरुच आहे. परंतु त्याचबरोबर राज्यव्यापी दौरेही करणार आहोत. पक्षाची भूमिका मांडून, कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहोत. हे सगळे करताना महायुतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस करणार आहे. अजितदादा पवार हे कामाने झपाटलेले विलक्षण नेतृत्व आहे. शब्दाचा पक्का माणूस आहे. या नेतृत्वाखाली काम करत असताना तरुणांचे, बेरोजगारांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध आहे असा शब्दही सुनिल तटकरे यांनी दिला. 

उद्याच्या निवडणूका अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर आम्ही लढवू असे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.