अजितदादांना गद्दार म्हणून दाखवा, हिंमत आहे का?
संजय शिरसाटांचे ठाकरे गटाला थेट आव्हान
छत्रपती संभाजीनगर,२६ ऑगस्ट /प्रतिनिधी :- वर्षभरापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षातून बंड केल्यानंतर शिंदे गट व ठाकरे गटातून अनेक आरोप- प्रत्यारोप झाले. एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिलेल्या आमदारांना ठाकरे गटाकडून वारंवार ‘गद्दार’ असं म्हटलं जातं. साधारण दोन महिन्यांपूर्वी मविआचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीतही अशीच फूट पडली. सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही आमदारांचा पाठिंबा मिळवत सरकारला साथ दिली. मात्र अजित पवार गटाला शरद पवार गटाकडून कोणीही गद्दार म्हटलं नाही. यावर मविआतील आणखी एक पक्ष फुटल्याने शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे गटाला थेट आव्हान दिलं आहे.
ठाकरे गटावर टीका करताना संजय शिरसाट म्हणाले की, काहीही करून आता लोकांच्या मनावर परिणाम होणार नाही. आम्हाला गद्दार म्हणता, अजितदादांना गद्दार म्हणून दाखवा, हिंमत आहे का? स्वतःचे घर भरण्यासाठी यांनी शिवसेना प्रमुखांचे विचार विकले. त्यांनी काय लपवले, दडवले हे काही दिवसानंतर बाहेर येईल. ठाकरे गटाकडे कार्यकर्ते नसतील पण पैसे नाही असं आम्ही तरी म्हणू शकत नाही. आम्ही बरंच जवळून पाहिलं. त्यांना आउंटगोइंग नको फक्त इनकमिंग पाहिजे, खोके छोटा शब्द आहे, तिकडे कंटेनर आहेत, असं राज ठाकरे साहेब सुद्धा म्हणाले होते, असंही शिरसाट यांनी नमूद केलं.
दरम्यान शरद पवार यांच्या अजित पवार आमचेच नेते आहेत, या विधानावर शिरसाट म्हणाले की, पवार साहेबांनी काही तासांतच वक्तव्य बदलले, हा गोंधळ का सुरू आहे, कारण काही लोकांना शरद पवार साहेबांची भूमिका कळत नाही. विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते म्हणाले होते की, विश्वासघात होऊ शकतो, तरी त्यांच्या साहेबांना हे कळत नाही. उद्धव ठाकरे यांनी याचा अभ्यास करावा आणि बडबड भोंग्याला लाथ मारून बाहेर काढावे. संजय राऊत म्हणतात हा गनिमी कावा आहे. अहो, हे अकलेचे तारे तोडत असल्याचा टोलाही शिरसाट यांनी लगावला.