औरंगाबाद सिटी बसला आग:जीवित हानी नाही

कंपनीच्या तपासानंतर आगीचे कारण स्पष्ट होईल

औरंगाबाद,१८ सप्टेंबर  /प्रतिनिधी :-करमाड ते सिडको सिटी बस क्रमांक 43 मध्ये तांत्रिक कारणामुळे वरूड फाट्यावर रविवारी आग लागून नुकसान झाले. ह्यामध्ये ड्राइव्हरच्या सतर्कतेमुळे काही जीवित हानी झाली नाही. बसची निर्माता टाटा कंपनीचे पथक येऊन घटनास्थळ वर पाहणी करणार आहे आणि तांत्रिक तपास पूर्ण करणार आहे. त्यानंतर आगीचे कारण स्पष्ट होईल.

रविवारी दुपारी जवळपास 12.30 वाजता सिटी बस क्रमांक 43 (MH20EL1363) करमाड वरून सिडको बस स्थानकाकडे प्रवाश्यांना घेऊन जात होती. तेव्हाच ड्रायव्हरला असे लक्षात आले की चाका मधून आवाज येत आहे. तेव्हा ड्रायव्हरने बस मधील सर्व 6 प्रवाश्यांना खाली उतरवले आणि बस डेपो वर उपलब्ध मेकॅनिकला मदतीसाठी फोन लावला. मेकॅनिकच्या म्हणण्यानुसार ड्रायव्हरने गाडी बंद करून परत सुरू केली. तेव्हा ड्रायव्हरला असे लक्षात आले की इंजिनला आग लागली आहे. हे बघून ड्राइव्हर आणि कंडक्टरने तत्काळ बस मध्ये उपलब्ध फायरचे सिलिंडर वापरून आग वीजवण्याचे प्रयत्न केले. परंतु आग वाढली होती. आगीमुळे बसचा वरचा भाग क्षतिग्रस्त झाला आहे व इंजिनचे काही घटक गळून गेले आहे. सिटी बस विभागाचे मुख्य चालन व्यवस्थापक राम पवनीकर घटना स्थळ वर पोचले होते आणि त्यांनी माहिती दिली की बसची कंपनी टाटा कडून एक पथक येऊन बसची पाहणी करून आगीचे कारण काय होते ह्याची तपास करतील.

सदर बसची नियमित सर्व्हिसिंग मागच्याच महिन्यामध्ये टाटाच्या सर्विस सेंटर येथे झाली होती. आता कंपनी कडून तपासणी झाल्यानंतर आगीचे कारण स्पष्ट होईल आणि त्याचवर पुढचे निर्णय घेतले जाईल, असे श्री पवनीकर ह्यांनी सांगितले.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली पाहाणी

करमाड ते सिडको या मार्गावरून जात असतांना तांत्रिक अडचणीमुळे धावत्या गाडीला अचानक आग लागली चालकाच्या वेळीच लक्षात आल्याने त्याने बस थांबवून सर्व प्रवाशांना खाली उतरवले त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसून बस मात्र संपूर्णपणे जळाली आहे. सदरील घटनेची विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी माहिती घेतली व संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क साधून बस ला अचानक आग का लागली याची माहिती घ्यावी अशा सूचना केल्या.