अंतरिम अर्थसंकल्प सर्वसमावेशक आणि नाविन्यपूर्ण अर्थसंकल्प असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

विकसित भारत अर्थसंकल्प विकसित भारताचा पाया मजबूत करण्याची हमी देतो: पंतप्रधान

या अर्थसंकल्पात सातत्य राखण्याचा विश्वास आहे

हा अर्थसंकल्प युवा भारताच्या आकांक्षांचे प्रतिबिंब आहे

आम्ही एक मोठे ध्येय ठेवले, ते साध्य केले आणि नंतर स्वतःसाठी आणखी मोठे ध्येय ठेवले

हा अर्थसंकल्प गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या सक्षमीकरणावर विशेष भर देतो: पंतप्रधान

नवी दिल्ली ,१ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-  “आज सादर झालेला अर्थसंकल्प हा केवळ अंतरिम अर्थसंकल्प नसून, सर्वसमावेशक आणि नाविन्यपूर्ण अर्थसंकल्प आहे,” अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. “या अर्थसंकल्पात सातत्त्याचा विश्वास आहे,” असे पंतप्रधानांनी नमूद केले आहे. पंतप्रधानांनी पुढे म्हटले आहे, “हा अर्थसंकल्प विकसित भारताच्या सर्व आधार स्तंभांना, म्हणजेच तरुण, गरीब, महिला आणि शेतकरी यांना सक्षम करेल.”

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या दूरदृष्टीची प्रशंसा करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “निर्मला जी यांचा अर्थसंकल्प देशाचे भविष्य घडवणारा अर्थसंकल्प आहे.” ते पुढे म्हणाले,” या अर्थसंकल्पात 2047 पर्यंत विकसित भारताचा पाया मजबूत करण्याची हमी आहे.”

“हा अर्थसंकल्प तरुण भारताच्या आकांक्षांचे प्रतिबिंब आहे,” अशी टिप्पणी पंतप्रधान मोदी यांनी केली. त्यांनी अर्थसंकल्पात घेतलेल्या दोन महत्वाच्या निर्णयांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “संशोधन आणि नवोन्मेषासाठी 1 लाख कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला आहे.” ते याव्यतिरिक्त, त्यांनी अर्थसंकल्पात स्टार्टअप्ससाठीच्या कर करसवलतींमधील विस्तारावर प्रकाश टाकला.

पंतप्रधान म्हणाले की, वित्तीय तूट नियंत्रणात ठेवताना या अर्थसंकल्पात एकूण खर्चात 11,11,111 कोटी रुपयांची ऐतिहासिक वाढ झाल्याचे दिसून आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले. “अर्थशास्त्रज्ञांच्या भाषेत, हा एक प्रकारचा ‘स्वीट स्पॉट’ आहे”. यामुळे भारतात 21 व्या शतकातील आधुनिक पायाभूत सुविधांच्या निर्मितीसह तरुणांसाठी रोजगाराच्या लाखो नवीन संधी निर्माण होतील, असेही ते म्हणाले.

वंदे भारत दर्जाच्या 40,000 आधुनिक बोगी तयार करून त्या सर्वसाधारण प्रवासी गाड्यांमध्ये बसवण्याच्या घोषणेचीही त्यांनी माहिती दिली, ज्यामुळे देशातील विविध रेल्वे मार्गांवर कोट्यवधी प्रवाशांना आरामदायक प्रवासाचा अनुभव मिळेल.

महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे निश्चित करण्याबाबत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “आम्ही एक मोठे ध्येय ठेवले, ते साध्य केले आणि नंतर स्वतःसाठी आणखी एक मोठे ध्येय ठेवले.” गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या कल्याणासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांवर प्रकाश टाकत त्यांनी सांगितले की, गावे आणि शहरांमध्ये 4 कोटींहून अधिक घरे बांधली गेली असून आणखी 2 कोटी घरे बांधण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

महिला सक्षमीकरणावर भर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “महिलांमध्ये 2 कोटी ‘लखपती’ बनवण्याचे आमचे ध्येय होते. आता ते वाढवून 3 कोटी ‘लखपती’ बनवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.”

पंतप्रधान मोदी यांनी आयुष्मान भारत योजने अंतर्गत गरिबांना सहाय्य करण्यासह, या योजनेचा लाभ अंगणवाडी आणि आशा कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचावल्याबद्दल प्रशंसा केली.

या अर्थसंकल्पात गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी नवीन संधी निर्माण करून त्यांना सक्षम करण्यावर सरकारने भर दिल्याचे पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले. त्यांनी रूफ टॉप सोलर मोहिमेचा उल्लेख केला, ज्यामध्ये 1 कोटी कुटुंबांना मोफत वीज मिळेल, तसेच सरकारला जादा वीज विकून वर्षाला 15,000 ते 18,000 रुपये उत्पन्न मिळेल.

पंतप्रधानांनी आज जाहीर केलेल्या आयकर माफी योजनेचा उल्लेख केला ज्यामुळे मध्यमवर्गातील सुमारे 1 कोटी नागरिकांना दिलासा मिळेल. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या प्रमुख निर्णयांबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी यांनी नॅनो डीएपीचा वापर, जनावरांसाठी नवीन योजना, पीएम मत्स्य संपदा योजनेचा विस्तार आणि आत्मनिर्भर तेलबीज मोहिमेचा उल्लेख केला ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि खर्च कमी होईल. या ऐतिहासिक अर्थसंकल्पाबद्दल सर्व नागरिकांना शुभेच्छा देऊन पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.