पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज जालना-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचे लोकार्पण

जालना,२९ डिसेंबर / प्रतिनिधी :-मुंबईला जोडणारी पाचवी वंदे भारत अर्थात जालना-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्स्प्रेसची उद्घाटनपर धाव आज, शनिवारी पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुनर्विकसित अयोध्या धाम जंक्शनचे उद्घाटन होणार आहे. त्यावेळी अयोध्येतूनच व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पंतप्रधान जालना वंदे भारतसह एकूण सहा वंदे भारत आणि दोन अमृत भारत रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

मुंबईतून शिर्डी, सोलापूर, मडगाव (गोवा), गांधीनगर या ठिकाणांना जोडणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस सध्या धावत आहेत. चारही वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. १ जानेवारी २०२४ पासून जालना-मुंबई वंदे भारत नियमित धावणार असून ही राज्यातील सातवी वंदे भारत असणार आहे.

जालना वंदे भारत वेगवान

मुंबई-जालनादरम्यान सीएसएमटी-जालना जनशताब्दी एक्स्प्रेस ही सध्याची वेगवान गाडी आहे. नव्या वर्षात जालना वंदे भारत एक्स्प्रेस सर्वांत वेगवान गाडी ठरणार आहे. मुंबई-जालना रेल्वे अंतर वंदे भारत सात तास २० मिनिटांत पार करणार आहे. जनशताब्दीला हे अंतर पार करण्यासाठी सात तास ४५ मिनिटे लागतात.

दादर, ठाणे, कल्याणला थांबा

जालना वंदे भारत एक्स्प्रेस मुंबईहून दुपारी १.१० वाजता रवाना होईल आणि जालन्याला रात्री ८.३० वाजता पोहोचणार आहे. दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड आणि छत्रपती संभाजीनगर स्थानकांवर रेल्वेगाडी थांबणार आहे.