जालना मराठा आंदोलन दगडफेक प्रकरण : ऋषीकेश बेद्रेला जामीन मंजूर

छत्रपती संभाजीनगर,१४ डिसेंबर / प्रतिनिधी :-जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनात पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या ऋषीकेश बेद्रेला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जामीन मंजूर करण्यात आला आहे. एक लाख रुपयांच्या जात मुचकल्यावर व तीन महिने बीडसह जालना जिल्ह्यात प्रवेश न करण्याच्या अटीवर न्या. संतोष चपळगावकर यांनी हा जामीन मंजूर केला आहे. ज्येष्ठ विधिज्ञ व्ही.डी. सकपाळ यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

अंतरवाली सराटी दगडफेक प्रकरणी अटकेत असलेल्या ऋषीकेश बेद्रेला खंडपीठात जामीन मंजूर झाला आहे. कोर्टाने एक लाख रुपयांच्या जातमुचकल्यावर व तीन महिने बीड आणि जालना जिल्ह्यात प्रवेश न करण्याच्या अटीवर हा जामीन मंजूर केला आहे.दरम्यान, ऋषीकेश बेद्रेवर पिस्टल बाळगल्याप्रकरणी देखील एक गुन्हा दाखल आहे.त्यावर मात्र अद्याप कुठे अपिल करण्यात आलेलं नसल्याची माहिती आहे. ऋषीकेश बेद्रे याला २४ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती.

काय होतं नेमकं प्रकरण?

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांचं जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी गावात अमरण उपोषण सुरु होतं. यावेळी आंदोलन सोडवण्यावरुन पोलीस आणि उपोषणकर्ते यांच्या बाचाबाची झाली. त्याचं रुपांतर वादात होऊन प्रकरण धक्काबुक्कीपर्यंत गेलं.यानंतर पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. आंदोलकांनी देखील दगडफेक केल्याचा आरोप पोलिसांकडून केला गेला. या घटनेत जखमी झालेल्या आंदोलकांचे रक्तबंबाळ फोटो राज्यभर व्हायरल झाल्याने जनतेत संतापाची लाट पसरली.यानंतर या घटनेत पोलीस देखील जखमी झाल्याचं समोर आलं. यानंतर या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी अनेकांना अटक केली होती. त्यात ऋषीकेश बेद्रे याला देखील अटक करण्यात आली होती.