मराठा कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी व वाटपासाठी विशेष कक्ष स्थापन

छत्रपती संभाजीनगर,६ नोव्हेंबर  /प्रतिनिधी :- मराठा- कुणबी, कुणबी- मराठा जात प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्ह्यात विषेश कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु झाला असून जात प्रमाणपत्र देण्याचे काम सुरु झाले आहे. आतापर्यंत 50 दाखले वाटप झाले आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी जनार्धन विधाते यांनी सांगितले.

हे जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक व अनिवार्य  पुराव्याची तपासणी करण्यासाठी न्या.शिंदे समितीची स्थापना करण्यात आली आहे. या  समितीने पुराव्याची वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसूल पुरावे. निजामकाळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करणे आणि पात्र व्यक्तींना मराठा- कुणबी, कुणबी – मराठा जात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरु आहे. यासाठी समितीच्या निर्देशाने विशेष कक्षाची स्थापना जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेऊन सर्व जिल्ह्यांमध्ये विशेष कक्ष स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. या कक्षामार्फत छत्रपती संभाजीनगर  जिल्ह्यात आजपर्यंत 50 कुणबी- मराठा जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहे, असे विधाते यांनी सांगितले.

जिल्हा कक्ष कार्यकारणी समितीत ओमप्रकाश रामावत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत),पी.एच.चौगुले, पोलीस उप अधिक्षक (गृह), श्री.वीर, जिल्हाअधिक्षक, भूमि अभिलेख, जयश्री चव्हाण, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), मधुकर देशमुख, शिक्षणाधिकारी (माध्यमिक),  संतोष झगडे, अधिक्षक, राज्य अबकारीकर, किशोर कुलकर्णी , जिल्हा जात पडताळणी समितीचे सदस्य सचिव, श्री. राजमोडे, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण, अशोक कायंदे, नगर पालिका प्रशासन अधिकारी, जि.अ.कार्यालय, जयवंत नाईक, अधिक्षक कारागृह, सय्यदा फीरासत, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सय्यद शाकीर अली, अधिक्षक, वक्फ बोर्ड, डॉ. भगवान साखळे, कुलसचिव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, अशोक गोटे, सहायक संचालक, राज्य पुरातत्व विभाग,भाऊसाहेब जगताप, विभागीय सहायक संचालक, भाषा संचालनालय इत्यादी विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

कक्षाची कार्यपद्धती

या जिल्हास्तरीय अधिकारी यांनी विशेष कक्ष,जिल्हाधिकारी कार्यालय, येथे उपस्थित राहुन विविध विभागांशी समन्वय साधणे, अभिलेखे उपलब्ध करुन घेऊन त्यांची छाननी करणे, कुणबी जातीच्या नोंदी असलेले अभिलेखे वेगळे करुन त्याबाबत विहित नमुन्यातील अहवाल कार्यालयास व समितीस सादर करणे इ.कामे विहित कालमर्यादेत  करण्यात येत आहेत.

या शिवाय मा.न्यायालयातील जुन्या अभिलेख्यांमध्ये देखील कुणबी-मराठा / मराठा-कुणबी /कुणबी असे जातीवाचक उल्लेख असलेले (सन 1967 पुर्वीचे) अभिलेखे उपलब्ध करुन देणे बाबत संबंधित न्यायालयाकडे विनंती करुन अभिलेखे उपलब्ध करुन घेण्यात येत आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात एकूण 50 कुणबी – मराठा, मराठा – कुणबी जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहे असे निवासी उपजिल्हाधिकारी  यांनी सांगितले.

लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष कार्यान्वित

लातूर : राज्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी मिशन मोडवर मोहीम राबविण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यासाठी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील मराठा- कुणबी नोंदी शोधण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.

तपासणी केलेली कागदपत्रे व नोंदी मिळालेली कागदपत्रे याची निर्दोष यादी तयार करण्यासाठी महसूल प्रशासन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, अप्पर जिल्हाधिकारी सुनील यादव, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्य सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार आणि महसूल कर्मचारी युद्धपातळीवर काम करीत आहेत. राज्यात जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत:हून कुणबी नोंदी तपासण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम हाती घ्यावी, त्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी आणि त्यांच्या नियंत्रणाखाली कर्मचाऱ्यांची उपलब्धता करून द्यावी. त्यांना आवश्यक ते मनुष्यबळ, साधनसामुग्री देखील तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार उपजिल्हाधिकारी अहिल्या गठाळ यांच्यावर विशेष कक्षाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

मोडी लिपी आणि उर्दू लिपी तज्ज्ञ यांच्याकडून लिप्यांतर करण्याचे काम

लातूर जिल्ह्यातील दहा तालुक्यातील कुणबी नोंदी तपासण्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी आदेश दिले असून सहा मोडी लिपी आणि उर्दू लिपी तज्ज्ञ यांच्याकडून लिप्यांतर करण्याचे काम सुरु आहे. जिल्ह्यातील सर्व जुन्या नोंदी बहुतांशी मोडी लिपीत आहेत, तर काही प्रमाणात उर्दू लिपीत आहेत. या सर्व नोंदीचे लिप्यांतर करण्याचे काम जिल्ह्यातील दहाही तालुक्यात युद्धपातळीवर सुरु आहे.