महायुतीने १४०० पेक्षा अधिक जागा जिंकत महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला

भाजपाने ७५० पेक्षा अधिक ग्रामपंचायती जिंकल्या

ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का

मुंबई :-राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ७५० पेक्षा अधिक ग्रामपंचायती जिंकत दणदणीत यश मिळवले आहे. या यशाबद्दल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाच्या  कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे. या निवडणुकीत भाजपा – शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीने १४०० पेक्षा अधिक जागा जिंकत महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला आहे. या यशाबद्दल भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश मुख्यालयात सोमवारी मुंबई अध्यक्ष आ.आशीष शेलार,विधान परिषदेतील गटनेते आ.प्रवीण दरेकर, ज्येष्ठ नेते सुनील कर्जतकर आदींच्या उपस्थितीत जल्लोष करण्यात आला.

राज्यात  ग्रामपंचायतींची नुकतीच निवडणूक झाली. या निवडणुकीत एकट्या भारतीय जनता पार्टीने ७५० पेक्षा अधिक जागा जिंकत राज्यात आपणच नंबर एक असल्याचे दाखवून दिले आहे, अशी प्रतिक्रिया मुंबई भाजपा अध्यक्ष आ.आशीष शेलार यांनी व्यक्त केली.भाजपा प्रदेश मुख्यालयात झालेल्या विजयोत्सव कार्यक्रमावेळी आ. शेलार पत्रकारांशी बोलत होते. भाजपाचे विधानपरिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले की, भारतीय जनता पार्टीने नेहमीच विकासाचे सकारात्मक राजकारण केले आहे.या राजकारणाला ग्रामीण भागातील जनतेने अनुकूल कौल दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उठसुठ आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणाऱ्यांना जनतेने सणसणीत चपराक दिली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा देवेंद्र फडणवीस हे मार्गी लावतील,असा विश्वास सामान्य माणसाला वाटतो असे या निवडणुकीतून दिसले,असेही आ. दरेकर यांनी नमूद केले.

ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का

राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका या पक्षीय पातळीवर किंवा चिन्हावर लढविण्यात आल्या नसल्या तरी सर्वच राजकीय पक्षांनी आम्हालाच चांगले यश मिळाल्याचा दावा केला आहे.

राज्यातील २३५९ ग्रामपंचायतींमधील सुमारे २० हजार जागांसाठी मतदान झाले होते. या निवडणुका पक्षीय पातळीवर किंवा पक्षांच्या चिन्हावर लढविल्या जात नाहीत. स्थानिक नेतेमंडळी आपापल्या समर्थकांना पॅनेलच्या माध्यमातून रिंगणात उतरवितात. तरीही भाजप, काँग्रेस, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने चांगल्या जागा जिंकल्याचा दावा केला आहे. काही नेत्यांना त्यांच्या प्रभाव क्षेत्रांमध्ये फटका बसला आहे.

भाजपला सर्वाधिक ७७८ ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळाल्याचा दावा, भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला. अजित पवार गटाला ४०७, शिंदे गटाला ३०१ ग्रामपंचायतींची सत्ता मिळाल्याची माहिती भाजपने दिली आहे. काँग्रेस, शरद पवार गटानंतर सर्वात कमी जागा या शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गाटाला मिळाल्याचा दावाही भाजपने केला.

काँग्रेसची टीका

ग्रामपंचायत निवडणूक निकालाबद्दल भाजपने केलेला दावा हा खोटा व हास्यास्पद आहे. मुळात या निवडणुका चिन्हावर लढल्या जात नाहीत, त्यांनी दिलेले आकडे हे खोटे आहेत, त्यांनी ग्रामपंचातींच्या नावासह यादी जाहीर करावी मग कळेल जनतेने कोणाच्या बाजूने निकाल दिला आहे.

नागपूर जिल्ह्यातही भाजपला अपयश आले आहे, भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील २३ ग्रामपंचयातीवर काँग्रेसने विजय मिळवला असून भाजपच्या वाटय़ाला फक्त २ ग्रामपंचायती निवडून आल्याचा दावाही पटोले यांनी केला.

७२१ ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा विजय-पटोले

भाजप पाठोपाठ काँग्रेसनेही ७०० पेक्षा अधिक ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा केला आहे. काँग्रेसने ७२१ तर महाविकास आघाडीने १३१२ ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केला. सर्वधिक ग्रामपंचायती आपल्या ताब्यात आल्याचा भाजपचा दावा पटोले यांनी फेटाळून लावला. हिम्मत असेल तर महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुका घेऊन दाखवा, असे आव्हानही त्यांनी सत्ताधारी भाजपला दिले.

घडय़ाळ तेच वेळ नवीन – तटकरे

आमचे नेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात एक नवे पर्व सुरू झाले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीने ते दाखवून दिले आहे. ‘घडय़ाळ तेच वेळ नवी’ अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रे पक्षाच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष – देवेंद्र फडणवीस

ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये ७५० पेक्षा अधिक ग्रामपंचायती जिंकून भाजपने पहिल्या क्रमांकाचे स्थान पटकविले आहे. महायुती सरकारला राज्यातील जनतेने दिलेला स्पष्ट कौल आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. महायुतीने १४०० पेक्षा अधिक ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. महाविकास आघाडीच्यी तिन्ही पक्षांना एकत्र मिळालेल्या यशापेक्षा भाजपच्या एकटय़ाची संख्या अधिक आहे. राज्यातील जनतेने स्पष्ट कौल भाजपच्या बाजूने दिल्याचा दावाही फडणवीस यांनी केला आहे.

बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांना मतदारांनी धडा शिकवलामुख्यमंत्री शिंदे यांचा ठाकरे यांना टोला

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांना ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मतदारांनी धडा शिकवला असून राज्याच्या सर्वांगीण विकासाचे निर्णय घेतल्यामुळेच जनतेने महायुती सरकारच्या बाजूने कौल दिल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. वर्षभरामध्ये आम्ही केलेली विकासाची कामे आणि सरकारकडून मिळणारे विविध लाभ लोकांपर्यंत पोहचवल्यामुळेच जनतेने महायुती सरकारला आपला कौल दिला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. महाविकास आघाडीने थांबवलेल्या प्रकल्पांना पुन्हा चालना देण्याचे काम  महायुती सरकारने केले आहे. राज्याचा सर्वांगीण विकास करण्याचे धोरण आम्ही आखले आणि तशी भूमिका घेतली. म्हणून राज्यातील सर्वसामान्य माणूस अगदी शेतकऱ्यांपासून उद्योजकांपर्यंत, महिलांपासून तरुण वर्गापर्यंत, जेष्ठांपासून कामगारांपर्यंत सर्वांना न्याय देण्याचे काम आमच्या सरकारने केले. खऱ्या अर्थाने शासन आपल्या दार घराघरात पोहचले असून हेच आपल्या कृतीतून मतदारांनी दाखवून दिल्याचे शिंदे यांनी सांगितले.