प्रत्येकाने एक तास स्वच्छतेच्या माध्यमातून महात्मा गांधीजी यांना स्वच्छांजली देण्याचा संकल्प करावा-  आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे आवाहन

नळदुर्ग/धाराशिव,१ऑक्टोबर  /प्रतिनिधी :-समृध्द व सशक्त भारताच्या निर्माणामध्ये पहिले महत्वाचे पाऊल हे स्वच्‍छतेचे आहे. यासाठी आपण स्वत:बरोबर आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी अंगी बाळगणे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी आज येथे केले.

भारत सरकार माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, सोलापूर यांच्या वतीने आयोजित ‘स्वच्छतेसाठी एक तास” या कार्यक्रमा प्रसंगी आमदार पाटील बोलत होते. आज सकाळी १० ते ११ या वेळेत नळदुर्ग किल्ल्यातील उपली बुरुज आणि पाणी महाल परिसराची स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी तुळजापुरचे आमदार राणा जगजीत सिंह पाटील, क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार, कृषी अधिकारी सचिन चव्हाण, प्राचार्य डॉ एस एस राठोड, मुख्याध्यापक सुनील पुजारी, क्षेत्रीय प्रचार सहायक अंबादास यादव, पर्यटन विकास समितीचे अध्यक्ष युवराज नळे आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार पाटील म्हणाले Cleanliness is next to Godliness” या महात्मा गांधीच्या घोषवाक्यानुसार पंतप्रधान यांनी स्वच्छतेचे महत्व लक्षात घेऊन ‘स्वच्छ भारत अभियानाची’ घोषणा केली. आणि या अभियानात मोठ्या प्रमानात नागरिक सहभागी होत आहेत.

यावेळी परिसरात पडलेले प्लास्टिक बॉटल, रपर्स विद्यार्थ्यांकडून गोळा करण्यात आले. या उपक्रमात राज्य पुरातत्व विभाग, नगर परिषद, महिला आर्थिक विकास महामंडळ, महिला बचत गट, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, धरित्री विद्यालय आणि पर्यटन जनजागृती समितीचे कार्यकर्ते आदी शासकीय आणि निमशासकीय संस्था सहभागी झाले होते.