पारधी समाजाच्या विद्यार्थ्यांना तात्काळ जन्म प्रमाणपत्र देण्याचे ग्रामसेवक आणि तलाठ्यांना अधिकार-सीईओ राहुल गुप्ता

धाराशिव,७ सप्टेंबर /प्रतिनिधी :- शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत पारधी समाजासाठी आवश्यक दाखले आणि लाभ वितरीत करण्यासाठी जिल्हयात वेगवेगळ्या गावांमध्ये शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहेत.विशेष म्हणजे पारधी समाजातील विद्यार्थ्यांना तात्काळ जन्मप्रमाणपत्र मिळावे यासाठी ग्रामसेवक आणि तलाठी यांना अधिकार देण्यात आले आहेत. जेणेकरुन ग्रामीण जनतेला वेळेवर हे दाखले मिळतील.असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी केले.

आज उस्मानाबाद शहरातील मार्केट यार्ड येथे आयोजित हैदराबाद मुक्ती संग्राम अमृत महोत्सवानिमित्त शासन आपल्या दारी या उपक्रमांअंतर्गत उस्मानाबाद तालुक्यातील पारधी,विमुक्त जाती-जमाती व भटक्या जमाती या समाजाच्या नागरिकांसाठी आयोजित शिबीरात श्री. गुप्ता बोलत होते.

श्री.गुप्ता पुढे म्हणाले, पारधी समाजातील मुला-मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन,जिल्हा परिषद आणि पोलिस अधीक्षक यांनी मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत शाळेला न जाणारे मुलें-मुली,मध्येच शाळा सोडलेले विद्यार्थी-विद्यार्थींनी यांना पुन्हा शाळेत आणण्यासाठी मिशन ड्रॉपआऊट हा सर्वे करण्यात येत आहे.यामध्ये या मुलांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत शिक्षण देण्यात येणार असेही ते म्हणाले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे,जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे,तहसीलदार शिवानंद बिडवे, अपर तहसीलदार निलेश काकडे, पोलिस निरीक्षक शेख,मुख्याधिकारी वसुधा फड, सुनिल काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पहाट कार्यक्रमातून पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणणार -पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी

हैदराबाद मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून शासन आपल्या दारी या उपक्रमातंर्गत जिल्ह्यातील पारधी समाजाला पहाट कार्यक्रमाच्या माध्यमातून विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहे.असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले.
आज पारधी आणि विमुक्त जाती-जमाती व भटक्या जमातीसाठी मार्केट यार्ड येथे आयोजित शिबीरात ते बोलत होते.
श्री.कुलकर्णी म्हणाले, पारधी समाजाच्या उद्धारासाठी जिल्हा पोलिस दलातर्फे मिशन पहाट या कार्यक्रमांतर्गत मुलांना पोलिस भरती आणि भरतीसाठी प्रशिक्षण दिले जात आहे.येणाऱ्या नवीन पिढीला चांगले शिक्षण,प्रशिक्षण आणि मुख्‍य प्रवाहात आणण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जातील.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे,मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता,उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे,तहसीलदार शिवानंद बिडवे,अपर तहसीलदार निलेश काकडे,पोलिस निरीक्षक शेख, मुख्याधिकारी वसुधा फड व सुनिल काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.