फडणवीस ,बावनकुळे यांचा अवमान केला तर त्याच भाषेत उत्तर देऊ

भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांचा इशारा

मुंबई,१२ सप्टेंबर /प्रतिनिधी :-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर हीन भाषेत टीका केल्यास उद्धव ठाकरे व त्यांच्या चेल्यांना  जशास तसे उत्तर दिले जाईल असा खणखणीत इशारा भाजपा  महिला मोर्चा प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांनी मंगळवारी  दिला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष वर्षा भोसले, महिला मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य मृणाल पेंडसे, भाजपा प्रदेश प्रवक्ते ओमप्रकाश चौहान यावेळी उपस्थित होते. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर वर्णद्वेषी भाषेत टीका करून भास्कर जाधव यांनी समस्त ओबीसी समाजाचा अपमान केला आहे. या बद्दल श्री. जाधव यांनी ओबीसी समाजाची माफी मागावी , अशी मागणीही श्रीमती वाघ यांनी केली.  

श्रीमती वाघ म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली जी-२० परिषदेची यशस्वी सांगता झाली. जगभरात भारताची मान उंचावली ,मोदी यांच्या नेतृत्वाची  प्रशंसा झाली. असे असताना उद्धव ठाकरे आणि त्यांच्या चेल्यांनी भाजपाच्या नेत्यांचा खालच्या स्तरावर जाऊन अवमान करण्याची स्पर्धाच लावली आहे. या नेत्यांच्या बालीशपणाची कीव येते . स्वत:च्या नाकर्तेपणामुळे आज उद्धव  ठाकरे यांची अवस्था करमणूक करणाऱ्या विदुषकासारखी झाली आहे असे श्रीमती वाघ म्हणाल्या. विदुषक निदान निखळ मनोरंजन तरी करतात पण हे कामदेखील श्री. ठाकरे आणि त्यांच्या टोळीला जमत नाही अशी कोपरखळी त्यांनी मारली. महिला मोर्चा तर्फे श्री.ठाकरे यांना विदुषकाचा पोषाख पाठवत असून हा पोषाख पाहून श्री. ठाकरे यांना आपण केवळ करमणुकीपुरते उरलो आहेत याची जाणीव होईल असेही त्या म्हणाल्या.

श्री. ठाकरे यांच्या टोळीतील सर्वज्ञानी संजय राऊत, शिवीगाळ करणारे भास्कर जाधव यांनी वेळीच तोंडाला आवर घालावा अन्यथा परिणामांस सामोरे जावे लागेल. आमचे नेते, कार्यकर्ते संस्कारी, संयमी आहेत मात्र यापुढे संयमाचा बांध फुटेल आणि त्याच भाषेत उत्तर मिळेल, असेही श्रीमती वाघ यांनी सांगितले.