पाणीपुरवठ्याच्या कामासाठी अडथळ्यांची शर्यत 

किमान उपलब्ध तेथे तरी खंड कमी करण्याच्या औरंगाबाद खंडपीठाची अपेक्षा 

छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगरवासियांना आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा होत असल्याच्या वृत्ताची दखल घेत खंडपीठाने चिंता व्यक्त करून ज्या भागात नव्या जलवाहिनीच्या कामातील जलकुंभ तयार आहेत तेथे तरी किमान आठ दिवसांपेक्षा कमी कालावधीत पाणी द्यावे, अशी अपेक्षा न्या. रवींद्र घुगे 

व न्या. वाय. जी. खोब्रागडे यांनी व्यक्त केली. 

मात्र, कामातील अडथळ्यांची कारणे सुनावणीवेळी देताना सध्या मजुरांची कमतरता भासत असल्याचे कंत्राटदारांच्या विधिज्ञांकडून सांगण्यात आले. जलवाहिनीच्या कामानुसार जमीनस्तरावर 

सहा व जमिनीपासून उंच ५३, असे मिळून ५९ जलकुंभ करण्यात येणार असून अद्यापपर्यंत केवळ चार जलकुंभाचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. या अनुषंगाने 

हनुमान टेकडी परिसरातील जमीनस्तरावरील २१.३० लाख लीटर क्षमतेचा, टिव्ही सेंटरनजीक उंचावरील २१ लाख लिटरचा, हिमायतबाग भागातील ३८ लाख लिटर व दिल्ली गेट परिसरातील ३० लाख लिटरचा जलकुंभ पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. यातील हनुमान टेकडी व टिव्ही सेंटर परिसरातील जलकुंभ ३१ ऑगस्टपर्यंत तर हिमायतबागेतील ३० सप्टेंबरपर्यंत व दिल्ली गेटचा जलकुंभ ३१ ऑक्टोबरपर्यंत देण्याचे आदेश यापूर्वीच  खंडपीठाने दिले आहेत. याेजनेच्या कामांच्या अडथळ्यांची माहिती कंत्राटदाराच्या वकिलांकडून देण्यात आली. त्यामध्ये मजुरांची कमतरता भासत असल्याचे खंडपीठापुढे सांगण्यात आले. तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने खंडपीठापुढे शीर्ष कामांच्या संदर्भाने दिलेल्या अहवालात जायकवाडीतील 

उद्भवच्या ठिकाणी पाहणी केली असता जोडपूल व आरसीसी वाॅल, या दोन्ही कामासाठी केवळ २२ कामगार असल्याचे कंत्राटदार प्रतिनिधी मधुकर पाटील यांच्या उपस्थितीत सांगितल्याची माहिती खंडपीठापुढे देण्यात आली. कामाच्या मंदगतीमुळे १८५ फुटिंगचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु केवळ ८७ फुटिंगचे काम पूर्ण झाले असून १ ऑगस्टपासून जोडपुलाच्या पायाचे खोदकाम तर ५ ऑगस्टपासून फुटिंगचे काम बंद असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसेच पीसीसी पाईल मध्ये वरून बार टाकणे, आरसीसी वाॅलमध्ये कमी बार टाकणे, अशा पद्धतीने चुकीच काम करण्याचा प्रयत्न 

कंत्राटदाराच्या  कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात येत असल्याचे मजीप्राचे शाखाअभियंता भिलवडे व पीएमसीचे प्रतिनिधी ऋत्विक थोरात यांनी मुख्य अभियंत्यांच्या निदर्शनास आणून देण्यात  आले. त्याबाबत कडक कारवाई करण्यात येईल, अशी ताकीद कंत्राटदार प्रतिनिधी मधुकर पाटील यांना दिल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले असून त्याची माहिती खंडपीठाला देण्यात आली.  

याप्रकरणी न्यायालयीन मित्र ॲड. सचिन देशमुख, मूळ याचिकाकर्ते ॲड. अमित मुखेडकर, ज्येष्ठ विधिज्ञ आर. एम. धोर्डे, राजेंद्र देशमुख, अनिल  बजाज, संभाजी टोपे, विनोद पाटील, मुख्य सरकारी वकील डी. आर. काळे आदींनी काम पाहिले.