जल जीवन मिशन :गावनिहाय सर्व्हेक्षण करुन अहवाल सादर करावा- जिल्हाधिकारी
छत्रपती संभाजीनगर,२२ ऑगस्ट /प्रतिनिधी :- ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत ‘हर घर जल’ ही योजना राबवण्याचा संकल्प भारत सरकारने केला आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील गाव, वस्ती-तांड्यांचे सर्व्हेक्षण करावे. ग्रामसभा बोलावून गटविकास अधिकारी, उपअभियंता पाणीपुरवठा यांनी जल जीवन मिशन संदर्भात दि.31 ऑगस्ट पर्यंत अहवाल सादर करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद (पाणीपुरवठा) जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांना प्रशासकीय मंजुरी मिळण्यासाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनबाबत बैठक घेण्यात आली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विकास मीना तसेच जिल्हा परिषद चे पाणीपुरवठा अधिकारी उपस्थित होते. जल जीवन मिशन योजनेचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. ते म्हणाले की, जल जीवन मिशन ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारली आहे. 2024 पर्यंत भारतातील गावागावात नळाद्वारे पुरेसे आणि सुरक्षित पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी ही योजना आहे. या योजनेसाठी प्रत्येक तालुक्यातील गावागावात तांडा वस्ती मध्ये जाऊन सर्व्हेक्षण करावे. या योजनेपासून एकही गाव वंचित ठेवू नका. या योजने संदर्भात सरपंच, ग्रामसेवक यांनी ग्रामसभा बोलावून स्थानिक आमदार, लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करावी. प्रत्येक तालुक्यात बीडीओ, तसेच उप अभियंता पाणीपुरवठा यांनी योजनेचा अहवाल 31 ऑगस्ट पर्यंत सादर करावा.