निसर्गकवी ना. धों. महानोर यांचे निधन

आज पळसखेड या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार 

पुणे ,३ ऑगस्ट /प्रतिनिधी :-ज्येष्ठ साहित्यिक व कवी नामदेव धोंडो महानोर यांचे आज सकाळी निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते. गेल्या काही दिवसांपासुन ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. प्रकृती ढासळल्याने ते व्हेंटिलेटरवर होते. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्य विश्वातून शोक व्यक्त केला जात आहे.

महानोर यांनी काव्यसंग्रहांबरोबरच अनेक चित्रपटांसाठीही गीते लिहिली. त्यांच्या या गीतांना त्यांच्या कवितांप्रमाणेच मराठी प्रेक्षकांची पसंती मिळाली. शुक्रवारी पळसखेड या त्यांच्या गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसस्कार करण्यात येणार आहेत.

महानोरांचा जन्म १६ सप्टेंबर १९४२ रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेडच्या शेतकरी कुटुंबात झाला. आई-वडील दुसऱ्याच्या शेतात राबत असत. महानोरांना चार भाऊ आणि तीन बहिणी. महानोर सगळ्यांत थोरले. पळसखेडला प्राथमिक शिक्षण झालं. पुढे वयाच्या दहाव्या वर्षी पुढील शिक्षणासाठी ते ८-१० कि.मी. अंतरावर असलेल्या शेंदुर्णीच्या शाळेत दाखल झाले.

शेंदुर्णीच्या शाळेतच त्यांची कवितेशी सुरुवातीला ओळख झाली. आणि त्यांना कवितेची गोडी लागली. शाळेत असताना शाळेच्या नाटकांमधून त्यांनी कामं केली. मॅट्रिक झाल्यानंतर महानोर जळगावच्या मूळजी जेठा महाविद्यालयात आर्ट्स शाखेत दाखल झाले. परंतु घरातल्या अडचणींमुळे वर्ष पूर्ण होण्याच्या आतच शिक्षण सोडून त्यांना गावी जाणं भाग पडलं. त्यांच्या वडिलांनी स्वत:ची पाच एकर कोरडवाहू जमीन विकत घेतली होती आणि शेतीच्या कामांसाठी वडिलांना मुलाची गरज होती.

महानोरांचं शिक्षण थांबलं आणि ते शेतीत रमले. पण याच शेतीने अथवा निसर्गाने त्यांच्यातला कवीला प्रेरणा दिली. ना. धों. यांच्या अद्भुत निसर्गकवितांनी वाचक-रसिकांना वेड लावलं आहे.

ना.धों. महानोर यांच्या कविता इतक्या बोलक्या होत्या की, ते निसर्गाशी संवाद साधत आहेत आणि त्याच कागदावर उमटवत आहेत असा भास व्हायचा.

ना. धो. महानोर यांनी आपल्या साहित्यात काहीवेळा बोलीभाषांचा वापर केला आहे. गेली ६० वर्षाहून अधिक काळापासुन साहित्यक्षेत्रात कार्यरत होते. मराठी काव्यविश्‍वात निसर्गकवी म्हणून महानोरांना ओळखले जाते. महानोर यांच्या कवितांनी बालकवी व बहिणाबाईंचा वारसा समृद्ध केला.

ना. धों. महानोर यांचे अनेक कवितासंग्रह वाचकांच्या पसंतीस उतरले. त्यात अजिंठा या दीर्घ काव्यसंग्रहाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. त्याचबरोबर गंगा वाहू दे निर्मळ, जगाला प्रेम अर्पावे, दिवेलागणीची वेळ, पावसाळी कविता, रानातल्या कविता असे त्यांचे कवितासंग्रह लोकप्रिय ठरले. यासह गपसप, गावातल्या गोष्टी हे कथासंग्रह देखील वाचकांच्या पसंतीस उतरले.रानकवी म्हणून ते अवघ्या साहित्य विश्वात प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कवितांवर बालकविंचा प्रभाव जाणवतो. त्यांनी ‘पानझड’, ‘तिची कहाणी’, ‘रानातल्या कविता’ या गाण्यांमधून पळसखेडची मराठवाडी लोकगीते प्रसिद्ध केली आहेत.

‘रानकवी’ ना. धों. महानोर यांनी मराठी साहित्यविश्व समृद्ध केले – राज्यपाल रमेश बैस

राज्यपाल रमेश बैस यांनी ज्येष्ठ कवी, गीतकार, साहित्यिक व माजी आमदार ना. धों. महानोर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

ना. धों. महानोर यांनी आपल्या लेखणीतून जनसामान्यांच्या मनाचा ठाव घेतला. त्यांचे साहित्य व काव्य हे वास्तवदर्शी व हृदयाला भिडणारे होते. त्यांची अनेक गीते लोकांच्या मनात आहेत. त्यांच्या निधनामुळे राज्याने मराठी साहित्यविश्व समृद्ध करणारा एक थोर कवी व साहित्यिक गमावला आहे, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ साहित्यिक, कवी ना. धों. महानोर यांना श्रद्धांजली

मातीत रमणारा, निसर्गाची अनेक रुपे आपल्या शब्दांतून उलगडून दाखवणारा संवेदनशील रानकवी हरपला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ साहित्यिक, कवी माजी आमदार ना. धों. महानोर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. महानोर यांच्या निधनामुळे मराठी साहित्य क्षेत्राची हानी झाल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

‘मराठी माती सर्जनशीलतेची खाण आहे. यात ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांनी आपल्या शब्द सामर्थ्याने निसर्गाची, राना- वनातील, पानाफुलांतील सौंदर्य अनेकविध रूपे रसिकांसमोर मांडली. ते प्रयोगशील शेतकरी होते. शेतकऱ्यांच्या सुखदुःखाची मांडणी करताना त्यांनी ग्रामीण जीवनाच्या अनेक पैलूंवर आपल्या लेखनातून प्रकाश टाकला. शेती, साहित्यिक मंच ते विधानपरिषद असा त्यांचा प्रवास राहिला. या सर्व ठिकाणी महानोर यांनी आपल्या संवेदनशील कवी मनाची अमीट छाप उमटवली आहे. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्य क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांची उणीव निश्चितच भासत राहील. ज्येष्ठ साहित्यिक, कवी माजी आमदार ना. धों.महानोर यांना भावपूर्ण श्रद्धांजली,’ असेही मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

रसिक मनाचे रानाशी मैत्र घडवून देणारा कवी हरपला

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांना श्रद्धांजली

मराठी साहित्याला मातीचा गंध देणारा ‘रानकवी’ हरपला

 ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांच्या निधनाने रसिक मनाचे रानाशी मैत्र घडवून देणारा कवी हरपला. त्यांच्या निधनाने मराठी साहित्याला एका वेगळ्या उंचीवर नेणारा महान साहित्यिक आपण गमावला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या शोकसंदेशात म्हणतात की,  ना. धों. महानोर यांनी कवितेला हिरवा शालू नेसवला. निसर्ग आणि स्त्री ही महानोरांच्या कवितेची केंद्रस्थानं आहेत. त्यांच्या कवितेत विविध गंध आहेत, विविध ध्वनी आहेत. ‘रानातल्या कविता’ या त्यांच्या कवितासंग्रहाने मराठी माणसावर गारूड केलं. लोकसाहित्यावर त्यांनी अलोट प्रेम केले. त्यांनी चित्रपटासाठी लिहिलेली गीते मनाचा ठाव घेणारी आहेत. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक थोर साहित्यिक गमावला आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटुंबियांना मिळो, ही ईश्वरचरणी प्रार्थना !

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कविवर्य ना. धों. महानोर यांना श्रद्धांजली

महाराष्ट्राच्या सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी

 “ज्येष्ठ साहित्यिक ना. धों. महानोर खऱ्या अर्थानं ‘रानकवी’ होते. निसर्गाच्या सानिध्यात राहून त्यांनी साहित्यसेवा केली. मराठी साहित्याला मातीचा गंध दिला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं जीवन, ग्रामीण संस्कृतीचं वैभव मराठी साहित्यात आणलं. त्यांच्या निधनाने मराठी साहित्याला मातीचा गंध देणारा ‘रानकवी’ हरपला, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, महानोर यांच्या ‘रानातल्या कवितां’नी वाचकांना निसर्गाची सहल घडवली. मराठवाडी बोलीतल्या ‘पानझड’, ‘तिची कहाणी’ ‘पळसखेडची गाणी’ सारख्या लोकगीतांनी मराठी साहित्य समृद्ध केलं. कवयित्री बहिणाबाई, बालकवींचा वारसा पुढे नेत त्यांनी साहित्यक्षेत्रात अढळ स्थान निर्माण केलं. निसर्गकवी म्हणून वावरताना निसर्गाची काळजीही घेतली. पाणलोट पर्यावरण क्षेत्रातल्या कार्याबद्दल ते ‘वनश्री’ पुरस्काराने सन्मानित होते.

 कविवर्य ना. धों. महानोर यांच्या निधनाने पवार कुटुंबियांनी घनिष्ठ मित्र गमावला 

राज्य शासनाच्या ‘कृषीभूषण’, केंद्र सरकारच्या ‘पद्मश्री’ पुरस्काराचे मानकरी ठरले होते. शेती आणि साहित्य क्षेत्रात यशस्वी मुशाफिरी करत असताना विधीमंडळात आमदार म्हणूनही प्रतिनिधीत्व केलं. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. पवार कुटुंबियांनी  घनिष्ठ मित्र गमावला आहे. महानोर कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सर्व सहभागी आहोत. ना. धों. महानोर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, अशी प्रार्थना करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी कविवर्य ना. धों. महानोर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.