इरशाळवाडी दुर्घटनेतील बाधितांचे कायमचे पुनर्वसन करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बचाव कार्य करणे व वाचलेल्या व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलवणे यास प्राधान्य

अलिबाग, २० जुलै /प्रतिनिधी :-  बचाव कार्य करणे व वाचलेल्या व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलवणे यास प्राधान्य दिले जात असून नियोजन झाले आहे. कायमचे पुनर्वसन करण्यासंदर्भात देखील विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याबरोबर चर्चा केली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अगदी सकाळीच दरड कोसळलेल्या इरशाळवाडीला पोहचले आणि दिवसभर बचाव कार्याला मार्गदर्शन व गती देण्याचे काम त्यांनी केले.

बचाव कार्यात येणाऱ्या अडथळ्यांबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, सतत पाऊस होत असल्याने मदत कार्यात अडथळे येत आहेत. अवजड यंत्रसामुग्री व अवजारे पोहोचण्यात अडचणी येत आहेत.  दोन हेलिकॉप्टर तैनात केले होते, परंतु ते खराब हवामानामुळे येथे पोहोचू शकलेले नाहीत, असे यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन येथे रात्रीपासून उपस्थित असून अधिकारी, रेस्क्यू टीम ही यांच्या संपर्कात रात्रीपासून होती, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले .

ते म्हणाले, बचाव कार्य करताना  स्वतःचे जीव धोक्यात घालून या ठिकाणी काम करत आहेत.  इथे मदत आणि बचावकार्य अवघड आहे, यात सहभागी स्वयंसेवी संस्थांचे त्यांनी यावेळी आभार मानले. तरीसुद्धा पाऊस असताना जे लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत त्यांना बाहेर सुरक्षित काढण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

इरशाळवाडी येथे पशुधनाची काळजी घेण्यासाठी पशुसंवर्धन विभाग सरसावला

. या दुर्घटनेत मदत कार्यात पशुधनाची काळजी घेण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत दोन पथके स्थापन करण्यात आली आहेत.

पथकामार्फत गुरुवारी 11 शेळ्या व 10 गोवर्गीय जनांवरावर उपचार करण्यात आले. तसेच या ठिकाणी एकूण 3 बैल व एक शेळी मृत आढळून आलेली असून, त्यांचे फोटो व पंचनामे करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ.शामराव कदम यांनी दिली.

पशुसंवर्धन विभागाच्या पथकाचे काम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील हे मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

इरशाळवाडी येथे बुधवारी रात्री अतिवतुष्टीमुळे दरड  कोसळली. या नैसर्गिक आपत्तीचे गांभीर्य लक्षात घेऊन पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा पशुसंवर्धन उपयुक्त व रायगड जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी त्वरित उपाययोजनेचे नियोजन केले. घटनास्थळी पशुधनाची काळजी घेण्यासाठी 1 सहाय्यक आयुक्त, 2 पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक व एक परिचर यांचे एक पथक यानुसार दोन पथके तयार करण्यात आली आहेत.

या पथकांमार्फत जखमी पशुधनास उपचार करणे, मृत पशुधनाचे फोटो व पंचनामे करणे, शास्त्रोक्त पद्धतीने मृत जनावरांची विल्हेवाट लावणे व जखमी पशुधनास खाद्याचे नियोजन करणे इत्यादी कामे करण्यात आली.

या पथकाद्वारे गुरुवारी पहाटे 5.30  वाजता प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली. जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या नियंत्रण कक्षात जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी व पशुधन विकास अधिकारी यांचा समावेश आहे. दुर्घटना ठिकाणी पशुधनासाठी साईबाबा मंदिर संस्थान पनवेल या संस्थेकडून खाद्य प्राप्त झाले असून, ते खाद्य शुक्रवारी इरशाळवाडी येथे पोहोच करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.